हरेक निवडणुकीत कटी पतंग...
हरेक निवडणुकीत कटी पतंग...
गत 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला 14 जागा मिळवून वनवास घडवलेल्या एमआयएमची प्रत्येक निवडणुकीमध्ये पतंग कटते कशी, हा औत्सुक्याचा विषय. 2014 तौफीक शेख यांनी प्रणितीताईंसमोर कडवे आव्हान उभे केले.2019 आणि 2024 मध्ये फारूक शाब्दी तगडे ठरले. हरेक निवडणुकांमध्ये त्यांना चढत्या क्रमाने मतं मिळाली. घात झाल्यामुळेच पतंग कटते हाच अनुभव. यंदा मात्र दोघा भाईजानच्या हातात घड्याळ असेल. आणि पतंगाची दोर काँग्रेसमधून नव्यानेच आलेले शौकत पठाण यांच्या हातात.
हैदराबादच्या ओवैसी बंधूंची मोठी ताकद सोलापुरी एमआयएमला देऊनही अपेक्षित यश नाही. तिचा अडथळा होतो काँग्रेसला. आणि लाभ भाजपाला. मध्य मतदारसंघात 2014,2019 आणि 2024 तसेच मनपा 2017. गत मनपा निवडणुकीत एमआयएमने 9 जागा जिंकल्या, पुढे महापौर निवडणुकीत तटस्थ राहिला. पुरेसे बहुमत नसतानाही भाजपाने पहिली लढाई जिंकली. शहर मध्य मधील बहुतांश ठिकाणी काँग्रेस मनपा निवडणुकीमध्ये पराभूत झाली. काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे अस्तित्वच या लढाईमुळे धोक्यात आले आहे.
ओवैसी यांचा पक्ष म्हणून एमआयएमच्या पाठिशी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहेत. काँग्रेसलाही अल्पसंख्यकांची काळजी. परंतु आपसातील संघर्षात भाजपा भारी ठरतो. पतंग नेहमी कटते. शौकत पठाण यांच्याकडे नेतृत्व आल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत किती *सरदार लढतात, हे कळेलच.अन्यथा पुन्हा पतंग कटल्याशिवाय राहणार नाही. मात्र जाता जाता पतंगाच्या मांज्याने काँग्रेसचा गळा कापू नये म्हणजे?
What's Your Reaction?