मार्केट कमिटीत शेतकर्यांची लूट! 50 हजाराऐवजी मिळाले फक्त रु.11 हजार
सोलापूर बाजार समिती निवडणुकीत मंद्रुपच्या शेतकर्याला संतापजनक अनुभव, 50 हजार रुपये किंमत मिळणेऐवजी बागवानांनी हातात टेकवले फक्त 11 हजार, छुप्या पध्दतीने अडत वसुली सुरूच. त्या व्यापार्यावर कारवाई नाहीच. शेतकर्यांनो आपली लूट थांबवण्यासाठी योग्य उमेदवारालाच करा मतदान.

(विजयकुमार पिसे)
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत यार्डात शेतकर्याची कशी लूटमार होते, हे चव्हाट्यावर आले आहे. मंद्रुपच्या रवी म्हेत्रे या शेतकर्याने (12 एप्रिल रोजी) मार्केट कमिटीत कलिंगड आणि टरबूज विक्रीस आणल्यानंतर हातात आलेली रक्कम आणि प्रत्यक्ष त्या फळांची किंमत याचा ताळमेळ कुठेच लागत नाही, हे उघड झाले. बाजार समितीत भाईजान व्यापार्यांची लॉबी मजबूत आहे. त्यामुळे कांदा, भाजीपाला आणि फळफळावळ काही असो. शेतकर्याला मातीमोल किंमत मिळणार. रवी म्हेत्रे यांना किमान 50 हजार रुपये मिळणे अपेक्षित होते, पण 11 हजारात त्यांना समाधान मानावे लागले.
रवी म्हेत्रे यांनी यार्डात विक्रीसाठी आणलेले कलिंगडे न मोजताच तोलाईची वसुली झाली. अडतबंदीचा कायदा होउन दहा वर्षे उलटली तरी छुप्या पध्दतीने अडत सुरू आहे. याशिवाय कॅरेट भाडे, गाडी भाडे, हमाल तोलाईचा इतका भार टाकला की शेतकरी नागवलाच गेला पाहिजे. दोन्ही अडत्यांनी हमी भावाची गॅरंटी दिली, पण प्रत्यक्षात फसवणूक. अडत संघटना अशा व्यापार्यांना पाठिशी घालते याचा अर्थ संघटना आणि मार्केट कमिटीत मिलीभगत आहे?
सोलापूर बाजार समितीचे संचालक असो वा पदाधिकारी आणि प्रशासक यांना शेतकरी हिताचे काही देणेघेणे नसावे. प्रशासक डॉ.प्रगती बागल यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. आताच्या निवडणुकीमुळे शेतकर्याच्या लुटमारीचा पर्दाफाश होईल का? पाहू या बागल किती प्रगती करतात ते? असा सवाल उपस्थित केला होता, पण आठवडाभरानंतरही त्या व्यापार्यावर अद्याप कारवाई झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही, त्यामुळे शेतकर्यांनो आपली लूट थांबवण्यासाठी निर्णायक मतदान करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हिताची काळजी घेणारा योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी लक्ष्यवेध न्यूज पोर्टलचे समस्त शेतकरी वर्गाला आवाहन.
What's Your Reaction?






