तुकाराम मुंडे यांचे अपहरण; डोळ्यांवर पट्टी बांधून वर्ध्यात सोडले

पोलिसांचा दबाव वाढताच आरोपींकडून वर्ध्यात मुक्तता

Jun 9, 2026 - 11:44
 0  63
तुकाराम मुंडे यांचे अपहरण; डोळ्यांवर पट्टी बांधून वर्ध्यात सोडले

बीड : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे एका कंत्राटदाराचे अपहरण करून तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांचा दबाव वाढल्याची चाहूल लागताच अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात सोडून पलायन केल्याचे समोर आले आहे.

परळी वैजनाथ येथील तुकाराम मुंडे हे औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. ४ जून रोजी दुपारी काम आटोपून घरी परतत असताना अज्ञात तिघांनी त्यांचे जबरदस्तीने चारचाकी वाहनातून अपहरण केले. त्यानंतर कुटुंबीयांकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

दरम्यान, बीड पोलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक आरोपींचा शोध घेत विविध ठिकाणी तपास करत होते. पोलिसांचा तपास वेगाने सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी ७ जून रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा गावाजवळ तुकाराम मुंडे यांना डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडून दिले.

रस्त्याने जात असलेल्या प्रसन्ना मांडवकर यांनी मुंडे यांना मदत करून हिंगणघाट पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी तत्काळ परळी वैजनाथ पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर पुढील तपासासाठी मुंडे यांना परळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके कार्यरत केली असून तपास सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow