अखेर भीमा-सीना नदीजोड प्रकल्प मंजूर
आ.सुभाष देशमुखांची दक्षिणमध्ये बारमाही सिंचन योजना बापू पाणीदार आमदार

सोलापूर : राज्य सरकारने भीमा-सीना जोड कालव्यास मंजुरी दिली आहे. यामुळे बारमाही सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार असून, आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
पावसाळ्यात वडापूर येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीतून खालच्या भागात जवळपास ६० ते १०० टीएमसी पाणी वाहून जाते. मात्र, कालवा पुर्ण झाल्यानंतर ते पाणी आता वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेजेस बांधून बोगद्याद्वारे सीना नदीत सोडले जाणार आहे. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार असल्याने बारमाही सिंचनासाठी मिळणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. भीमा-सीना जोडकालव्यासाठी ०.५११ टीएमसी पाण्याच्या तरतुदीस शासनाने १ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली. या जोड कालव्यामुळे सीना नदीवरील एकूण ५३ किमी लांबीच्या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. सुभाषबापूंनी या योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. पावसाळ्यात वडापूर येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीतून खालच्या भागात पाणी वाहून जाते. वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधून हे पाणी बोगद्याद्वारे सीना नदीत सोडले जाणार आहे. वडापूर बॅरेज येथून जोडकालव्याद्वारे १४.४७ दशलक्ष घन मीटर इतके पाणी सीना नदीत येणार आहे. नदीवरील नंदूर, वडकबाळ, सिंदखेड, बंदलगी, कोर्सेगाव व कुंडल येथे कोल्हापूर पद्धतीच्या ६ बंधाऱ्यात उजनी धरणाचे पाणी उपलब्ध होणार आहे. या जोड कालव्याची लांबी १८ किमी असून सीना नदीवरील कोल्हापूर बंधारा अकोले मंद्रूप ते कुडल संगमपर्यंत ३५ किलो मीटर अंतराचा आहे.
*२८ गावांना लाभदायी* : नंदूर, डोणगाव, तेलगाव, अकोले मंद्रुप, गुंजेगाव, पाथरी, वांगी, मनगोळी, वडकबाळ, वांगी, हत्तूर, समशापूर, सिंदखेड, बिरनाळ, चंद्रहाळ, होनमुर्गी, बंदलगी, औराद, राजूर, संजवाड, चिंचोली, कोर्सेगाव, कुमठा, केगाव, हत्तरसंग, बोळकवठा, कल्लकर्जाळ या भागात बागायती क्षेत्र वाढू शकते. तसेच कृषी उत्पन्नाला गती येणार, असे आ.देशमुख यांनी सांगितले.
ही योजना लवकरच कार्यान्वीत होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या विकासाला व उत्पन्नाला चांगलीच गती मिळणार आहे, असेही आ.सुभाष देशमुख म्हणाले.
What's Your Reaction?






