वारकऱ्यांसाठी पुण्यात "वारी मित्र घर''! रा.स्व. संघ धर्माचार्य गतिविधीचा अनोखा उपक्रम
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रा.स्व. संघ धर्माचार्य गतिविधी आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे ‘वारी मित्र घर’ अभियान सुरू. महिला वारकऱ्यांसाठी घरे, शाळा आणि खासगी स्वच्छतागृहे खुली करण्याचे आवाहन.
पुणे : 'वारीतील महिला वारकऱ्यांसाठी खासगी स्वच्छतागृहे खुली करण्याचे व शाळा, महाविद्यालयांनाही सहभागाचे आवाहन केले. तसेच रा.स्व.संघ धर्माचार्य गतिविधी यांनी 'वारी मित्र घर' अभियान सुरू केले आहे.
अतिवृष्टीमुळे आषाढी वारीतील अनेक वारकरी थेट पुण्यात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुण्यात आलेल्या वारकऱ्यांची राहण्याची आणि विशेषतः स्वच्छतागृहांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्माचार्य गतिविधी आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने 'वारी मित्र घर' अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील मध्यवर्ती पेठ भागातील नागरिकांनी, व्यापारी आस्थापनांनी आणि खासगी शाळांनी आपली स्वच्छतागृहे वारकऱ्यांसाठी खुली करावीत, असे आवाहन केले आहे.
धर्माचार्य गतिविधीचे सहसंयोजक ह.भ.प. मंगेश महाराज मोरे आणि रवी हिरवे यांनी ही माहिती दिली.अतिवृष्टी मुळे अडकलेल्या वारकऱ्यांसाठी ही तातडीची व्यवस्था करण्यात आली आहे. वारी पुण्यात आल्यानंतर महिला वारकऱ्यांचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वच्छता राखणे हे प्रत्येक पुणेकराचे कर्तव्य होय. त्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.
मोरे म्हणाले, शहरातील प्रत्येक कुटुंबाने किमान ५ महिला वारकऱ्यांसाठी आपल्या घरातील स्वच्छ शौचालय वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावे आणि तशी कल्पना संबंधित दिंडी प्रमुखांना द्यावी. ज्या खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये दिंड्यांचा मुक्काम नाही, त्यांनी आपल्या वास्तू मधील शौचालये वारकऱ्यांसाठी दिवस-रात्र खुली ठेवावीत. शहरातील दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि अन्य खासगी मालकीच्या इमारतींमधील शौचालयेही वारकऱ्यांच्या वापरासाठी खुली करण्यात यावीत. असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?