स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बील; महावितरणची 'स्मार्ट' सक्ती नको, स्थगिती द्या!
आ. देवेंद्र कोठेंनी वेधले विधीमंडळात लक्ष, ज्या घराचे बील ५०० येते, तिथे १५०० रुपये बील, स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यास स्थगिती द्या!
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनात आ. देवेंद्र कोठे यांनी वीज पुरवठ्यासाठी स्मार्ट मीटरमुळे अनेकांचे वीज बील दुप्पट, तिप्पट येत आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधून घेत स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यास स्थगिती द्यावी, अशी आग्रही मागणी देखील केली. गेल्या दोन महिन्यांमध्ये ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे त्यांना दुपटीने, तिपटीने बीज बिल येत आहे. त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
अनेक ठिकाणी हे स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत असून सोलापूरकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांना घर भाड्याच्या दुपटीने वीज बील आले आहे. ज्या घराचे वीज बील दरमहा ५००रुपये येत होते अशा घरात तब्बल १ हजार ५०० रुपये बील आले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने स्पष्टीकरण द्यावे. स्मार्ट मीटरमध्ये तांत्रिक चुका असल्यास सरकारने हे स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी आ.कोठे यांनी अधिवेशनात केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांना कायम करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. परंतु तरीही मंत्रालयातील एका अधिकार्याने जाणीवपूर्वक काम करणार्या अधिकार्यांना सेवेतून स्थगिती दिली आहे. अशा अधिकार्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात काम करणार्या अनेक वर्षांचा तांत्रिक अनुभव असणार्या अभियंत्यांना कायम करण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहात केली.
पावसाळी अधिवेशनात आ.कोठे यांची जनहिताच्या प्रश्नांवर विशेषत: मनपा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचे प्रश्न, अंगणवाडी मदतनीसांचे प्रश्न, अतिरिक्त हृदयरोग रुग्णवाहिकेची मागणी, सार्वजनिक आरोग्य परिचारकांचा प्रश्न, सोलापूर शहराची १ हजार ४०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, ई बस सेवा, पालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाविषयी आवाज उठवला आहे. विशेष म्हणजे संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडून ठोस आश्वासने देखील मिळाली आहेत.
What's Your Reaction?