पद्मश्री अरण्यऋषी चित्तमपल्ली कालवश! वयाच्या 94 व्या वर्षी देहावसान
लक्ष्यवेध परिवाराची भावपूर्ण श्रध्दांजली : डॉ.मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार, भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मान, सोलापुरात झालेल्या (2006/79वे) अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

(विजयकुमार पिसे)
भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि सोलापूरचे सुपुत्र अरण्यऋषी मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचे बुधवारी 18 जून रोजी सायं 7.50वा वयाच्या 94 व्या वर्षी राहत्या घरी वृध्दापकाळाने देहावसान झाले. आयुष्यातील तब्बल 65 वर्षे जंगलात रमलेले चित्तमपल्ली वनखात्यात वनाधिकारी म्हणून 36 वर्षे नोकरी केली. प्रतिभावान लेखक आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे पक्षीतज्ञ ही त्यांची खरी ओळख. जंगलातील पशुपक्षी आणि वन्यउपज याचा बारकाईने अभ्यास, जवळून सहवास, चिंतन आणि लेखन केले. त्यामुळे त्यांना अरण्यऋषी ही उपाधी लागली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने त्यांना नवी दिल्लीत नुकतेच सन्मानित करण्यात आले होते. यावेळी झालेल्या प्रवासानंतर डॉ.चित्तमपल्ली यांचा थकवा वाढला. स्वास्थ्यही बिघडले.
गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्न घेणे बंद केले होते. दिवसभरात ते तीन वेळा दूध घेत. बुधवारी सायंकाळी त्यांनी अर्धा ग्लास पाणी प्राशन केलेहोते. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
निसर्ग आणि वन्यजीव हा त्यांचा आवडीचा आणि आस्थेचा विषय होता. यातूनच ते प्रतिभावंत साहित्यिक झाले. तसेच वन्यजीव संवर्धनासाठी चळवळ उभी केली. पक्षी जाय दिगंतरा ही त्यांची प्रसिध्द साहित्यकृती. याशिवाय रानवाटा, चैत्रपालवी, चकवा चांदण, जंगलची दुनिया, रातवा, रिठी गाव, हिरवे हात, निळावंती, पाखरमाया अशी 14 पुस्तके लिहिली. 2006 मध्ये सोलापुरात झालेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते
अक्कलकोट रस्त्यावरील मनिधारी सोसायटी येथील निवासस्थान येथून त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि.19जून रोजी दुपारी 1वाजता निघणार आहे. रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, त्यांच्या मागे भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
डॉ.चित्तमपल्ली यांचा परिचय..
भारतीय पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक. मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 मध्ये सोलापूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सोलापूरच्या टी. एम. पोरे विद्यालयात प्राथमिक तर नॉर्थकोर्ट टेक्निकल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे दयानंद कॉलेजमधून इंटरमीजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. इंटरमीजिएट सायन्स परीक्षेतील यशामुळे त्यांच्या पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, कोईमतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. 1958-60 या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव(मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर (अहिल्यानगर) वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. त्यांनी नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं.गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे आणि वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. तसेच त्यांनी जर्मन आणि रशियन या भाषांचेही अध्ययन केले.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले. निवृत्तीच्या वेळी (1990) ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक पदावर होते. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली. वन्यजीव अभ्यास, सहवास, संशोधन आणि चळवळ यातूनच पुढे पक्षीतज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनी वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले.
पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली वन्यप्राणी संस्था हिचे संस्थापक सचिव, राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती आणि औरंगाबाद (छ.संभाजीनगर)च्या मराठी अभ्यासक्रम मंडळात सक्रिय होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालकही राहिले. त्यांनी पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षिशास्त्र (संस्कृत-मराठी अनुवाद), घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप (इंग्रजी-मराठी अनुवाद), पक्षिकोश, आनंददायी बगळे, निळावंती, केशराचा पाऊस इत्यादी पुस्तके आणि चकवा चांदणं हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले.
अनेक पुरस्कारांनी सन्मान...
चितमपल्ली यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना जंगलाचं देणं (1989), रानवाटा (1993) व रातवा (1994) या त्यांच्या साहित्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुरस्कार दिले. त्यांना 1991 मध्ये विदर्भ साहित्य संघ पुरस्कार मिळाला. रानवाटासाठी त्यांना 1991 मध्ये सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार आणि मृण्मयी साहित्य पुरस्कार असे दोन पुरस्कार मिळाले. इचलकरंजी येथील फाय फाउंडेशन प्रतिष्ठानाकडून त्यांना 1991 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य सेवेच्या सन्मानार्थ 1999 मध्ये विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्याकडून साहित्य वाचस्पती हा पुरस्कार प्राप्त झाला.
पक्षी आणि निसर्गाविषयी 36 वर्षे निरीक्षण करून चितमपल्ली यांनी अनेक पुस्तके लिहिली. मराठी विश्वाला एक नवे परिमाण प्राप्त करून दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन आणि मराठी विज्ञान महासंघ यांच्याकडून 1996 मध्ये चितमपल्ली यांचा सन्मान करण्यात आला. 1998 मध्ये विदर्भ साहित्य संघाचे सन्माननीय पद त्यांना मिळाले. औदुंबर येथील 57 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद चितमपल्ली यांना जानेवारी 2000 मध्ये मिळाले. तसेच विदर्भ संमेलन आणि उमरखेडच्या 51 व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना 2000 मध्ये मिळाले. सोलापूर येथे जानेवारी 2006 मध्ये भरलेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. हे संमेलन त्यांच्या जन्मभूमीत पार पडले. नागपूर (विदर्भ) येथील वास्तव्यानंतर पुढे अखेरपर्यंत सोलापुरातच त्यांचे वास्तव्य होते.
What's Your Reaction?






