स्वतःच्या स्वार्थासाठी नद्यांचे आरोग्य बिघडवले आता नदी, नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या
जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह म्हणाले, पाणीदार बनवा!

आज सर्वत्र प्रदूषण वाढले आहे. प्लास्टिकचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे नदी, नाले, समुद्र प्रदूषित बनले आहेत. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी नद्यांचे आरोग्य बिघडवले आहे. वेळीच खबरदारी घेऊन नदी, नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत आपला परिसर पाणीदार बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रसिध्द जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
पु.अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पीएम उषा योजनेअंतर्गत कार्यशाळेत जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चूघ, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, एनएसएस समन्वयक डॉ. विरभद्र दंडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात देखील पर्यावरण, प्रदूषण, जलसाक्षरता या विषयावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळेल.
नदी, नाल्यांच्या आरोग्यावर सर्वांनी प्रेम करणे आवश्यक आहे. आज पाण्यावरच जीवन अवलंबून आहे. पाणीदार परिसर होण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण, छोटे, मोठे बंधारा तयार करणे, जमिनीत पाणी मुरवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. पाणी असेल तर शेतकर्यांना देखील मोठा फायदा होतो. चांगली शेती कसता येते. त्यासाठी सर्वांनी यावर प्रेम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, हरित पर्यावरणासाठी पाच वर्षात पाच लाख वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे.
याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, अॅड. मल्लिनाथ शहाबादे, ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, रजनीश जोशी, डॉ. विनोद बोधनकर, मिलिंद पगारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. वीरभद्र दंडे यांनी मानले.
What's Your Reaction?






