विरोधक नडले, विधेयक पडले! नारी शक्ती सन्मानला धक्का
देशात मध्यावधीची शक्यता, एनडीए सरकारची प्रथमच कोंडी, राहुल म्हणाले, चेहरा पाहिला का, राहुल गांधींचा ध़िक्कार
(विजयकुमार पिसे)
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकावरून केंद्र सरकारची संसदेत कोंडी झाली. विरोधक नडले आणि विधेयक पडले. पुरेशा बहुमताअभावी (दोन तृतीयांश) लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले. मोदी 3.0 सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो. दरम्यान एनडीएची शनिवारी तातडीची निर्णायक बैठक होणार आहे. या सर्व राजकीय घडामोंडींच्या पृष्ठभूमीवर देशात मध्यावधीची शक्यता वर्तविली जात आहे.
मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी नारी सन्मान विधेयकाच्या माध्यमातून महिलांना 33 टक्के आरक्षणाची कार्यवाही 2029 च्या निवडणुकीत करण्याची योजना होती. यासाठी 16 आणि 17 एप्रिल रोजी दोन दिवस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने लोकसभेत 298 तर विरोधात 230 खासदारांनी मतदान केले. वास्तविक 360 मतं पडणे अपेक्षित होती. 62 मते मिळवण्यात सत्ताधारी एनडीए सरकारला अपयश आल्यामुळे प्रथमच मोठी नामुष्की पत्करावी लागली लागली आहे.
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच सरकारने या संदर्भातील आणखी दोन विधेयके मागे घेतली आहेत. त्यामुळे महिला आरक्षणाशी संबंधित तिन्ही विधेयकांच्या संदर्भात सरकारची पिछेहाट झाली आहे. विधेयक नामंजूर झाल्यामुळे त्याच्या निषेधार्थ भाजप आणि एनडीएच्या पक्षांचे कार्यकर्ते 18 रोजी इंडिया ब्लॉकमधील पक्षांच्या नेत्यांच्या घरांबाहेर आंदोलन करणार आहेत.
संविधानावरील आक्रमण परतून लावले- राहुल गांधी
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले. संविधानावर आक्रमण करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. आम्ही ते आक्रमण परतवून लावले. आम्ही त्यांचा पराभव केला. लोकसभेत विधेयक नामंजूर झाल्यानंतर तुम्ही पंतप्रधान मोदींचा चेहरा पाहिलात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या या विधानाचा भाजपा नेत्यांनी ध़िक्कार केला आहे.
What's Your Reaction?