होशियार! केजरीभाईची हायटेक विपश्यना
पंजाबात फक्त भगवंत मान, पण यांचा मान न मान, मै तेरा मेहमान

(विजयकुमार पिसे)
केजरीभाईंनी ठरवलं तर ते कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. दिल्ली गमावली, आता लक्ष्य पंजाब असून तिथे त्यांनी हायटेक विपश्यना सुरू केली आहे. त्यांची विपश्यना म्हणजे सत्तातुरानाम. अर्थात अशी विपश्यना केली की या पक्षाची "आपदा" संपते आणि आम आदमी सत्तेवर बसतो., असे दाव्यानिशी म्हटले जाते.
आपचे सर्वेसर्वा अरविंंद केजरीवालांनी दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर काल पंजाबला रवाना झाले असून 10 दिवस होशियारपुरात विपश्यना करणार आहेत. याआधीही केजरीवाल यांनी तीन वेळा विपश्यना केली, तेव्हा ते पुन्हा सत्तेत आलेत,अशी वदंता आहे. त्यामुळे पंजाबात मान यांना हटवून केजरीभाई सीएम होणार, अशी आम चर्चा आहे.
होशियारपूर येथे 10 दिवस केजरीवाल सहकुटुंब विपश्यना करणार आहेत. या संदर्भात काँग्रेसने दावा केलाय की, केजरीवाल पंजाबच्या राजकारणात मोठी भूमिका बजावतील. कारण अनेक आप आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, त्यांचा जुगाड करणे आणि सीएम भगवंतसिंग मान यांना हटवून स्वत: सीएम होणे. यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. पण ती अफवा असल्याचे सांगितले जाते. दरम्यान कॅग अहवालानंतर केजरीभाईंवर कारवाई अटळ आहे. त्यामुळे त्यांनी होेशियारपूची हायटेक विपश्यना सोडून तुरुंगातील विपश्यनेची तयारी करावी, अशी खोचक टीका दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी केली आहे. या विपश्यनेनंतर आम आदमी पक्षाचा कोणता डेमोग्राफ बदलतो, याची उत्सुकता आहे. पण तूर्तास तरी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान अरविंदभाईंच्या विपश्यनेमुळे अस्वस्थ आहेत.
What's Your Reaction?






