या हो या... अवघे सारे या! पापम् पवित्रम्!*पार्टी विथ डिफरन्स; हेच ते..
नाशिकमधे पुढील वर्षी सिंहस्थ मेळा भरणार आहे. धार्मिक़ आणि सामाजिक समरसतायुक्त... पण त्या आधी राजकीय धुळवड...

(विजयकुमार पिसे)
आता महानगरपालिकांच्या निवडणुका. निवडणुकीच्या युध्दात सारं काही क्षम्य असतंय म्हणे... हवं तर म्हणू या कुटनीती. त्यासाठी दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ताचा मित्र. सुधाकर बडगुजर आमच्या पार्टीत हवाय. बबनराव घोलप जे समाजकल्याणमंत्री, ज्यांनी स्व-समाजाचंही कल्याण केलं की नाही कुणास ठाऊक? पण हो चर्मोद्योग घोटाळ्यात बबनरावांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. तेही आमच्यात (भाजपात) पाहिजेच. असे कोण कोण? असतील ते अवघे सारे या... इथं पापम् पवित्रम्।
पवित्रम पक्षात संकटमोचक गिरीश महाजन असे गावोगावी असतील ना तर अगदी थेट गावपातळीपासून दिल्लीपर्यंत आपलाच झेंडा फडकणार निश्चित. (सध्या तो फडकतोय, आता कायमचाच फडकत राहिला पाहिजे, हा संकल्प) 2019 च्या निवडणुकीत म्हणून तर कमाल झाली. कारण महाजनांच्या प्रयत्नाने कितीजण भाजपात आले, त्यांना तिकीटंही मिळाली. आमदार,खासदार,मंत्री झाले. त्यांना पक्षाची व सत्तेची पदं देखील मिळालीत. ही यादी तशी खूप मोठी असेले. हे महाजनप्रिय पैक़ी कितीजण आता भाजपात असतील? त्याचबरोबर आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, सलीम कुत्ताचे बडगुजरबरोबर छायाचित्र आहेत, तसे महाजनांसोबतचे छायाचित्रही आहेत. त्यामुळे महाजनांना जो निकष तोच सुधाकर बडगुजर यांनाही. पापम् पवित्रम्।
*चर्मोद्योग घोटाळा शिरोमणी बबनराव घोलप समाजाच्या नावावर मोठ्ठे झाले. बाळासाहेबांची शिवसेना ते उध्दवांची शिवसेना दरम्यान अनेक पक्ष फिरून आता त्यांचंही भाजपात पापम् पवित्रम्। मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात समाजकल्याणमंत्री. त्यांच्या घोटाळ्यावर अण्णा हजारेंनी आवाज उठविला. आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तब्बल 13 वर्षं खटला चालला. त्यामध्ये घोलप पती, पत्नी दोघेही दोषी आढळले. तरीही त्यांना पवित्रम पक्षात प्रवेश. आणखी एक मंत्री आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप होते, कोर्टात निर्दोष सिध्द झाल्यामुळे काळेचे "गोरे" झाले. आता नुसतेच मंत्री नाही, तर पालकमंत्री म्हणून वाढीव (प्रमोशन) जबाबदारी. पवित्रम पक्षात असे अनेक इनकमिंंगवर किती मोठा विश्वास?
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे मकाउ येथे गेले असताना कॅसिनोत खेळतानाचे छायाचित्र सकाळी 9 वाजता संजय राउत यांच्या दररोज नेहमीच्या प्रेस कॉन्फरन्समधून बाहेर आणले. यामागेही बडगुजर होते, अशी तेव्हाची चर्चा. बावनकुळे, आ.सीमा हिरे यांना बडगुजरांची झळ बसलेली आहे. विधानसभेत गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनीच एसआयटीची घोषणा झाली. तरीही महाजनांची शिफारस हाच अंतिम आदेश असेल तर संघटना आणि संघटन हवेच कशाला? तमाम कार्यकर्तेच असा प्रश्न उपस्थित करताहेत. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची जेव्हा कुणकुण लागली, तेव्हा नाशकातील स्वयंसेवकांनीही नाराजी प्रक़ट केली. पण करणार काय? पापम् पवित्रम्।
*भाजपाचा झेंडा फडकला तेव्हा*
अक्कलकोट मतदारसंघात 1995 मध्ये पहिल्यांदा भाजपाचा झेंडा फडकला, तेव्हा भाजपा उमेदवार बाबासाहेब तानवडे यांना मतदारांची सहानुभूती मिळावी म्हणून आम्ही बातमी प्रक़ाशित केली होती, "काँग्रेसचा उमेदवार दाऊदचा हस्तक, मतदारांच्या माथी टेकवतो मस्तक" या बातमीचा परिणाम जो व्हायचा तो झाला. तानवडे विजयी झाले. तसेच शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कनेक्शन अशाही बातम्या आल्या होत्या. ज्यामुळे काँग्रेस (पवारसह एकत्रित काँग्रेस) किती अगतिक आहे हे कळून चुकले. विशेष म्हणजे दाऊद इब्राहिमचे नाव मुंबई बॉम्बस्फोटच्या घटनेनंतर पुढे आले. तसेच तत्कालिन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी जाहीरपणे दाऊदला परफटत आणू अशी घोषणा केली होती. तेव्हा काँग्रेस अगतिक होती, आणि आज सर्वकाही अनुकूलता असताना भाजपा इतकी अगतिक का? दाऊदचा साथीदार सलीम कुत्ताबरोबर जे मित्र आहेत, त्यांना पावन करून निर्मळ मनाने भाजपात घेतो.
What's Your Reaction?






