आणखी एका माजी आमदाराच्या प्रॉपर्टीवर संक्रांत
पीएनबी बँकेची उत्तर सोलापूर तालुक्यात कारवाई

गेले महिनाभरात सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदारांच्या साखर कारखान्यांत झालेले आर्थिक व्यवहार, कर्ज प्रकरण आणि साखर विक्री प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने साखर सम्राट नेत्यांच्या प्रॉपर्टीवर संक्रांत कोसळली आहे. राष्ट्रीयीकृत बँका, सहकार क्षेत्रातील बँकांची ही कारवाई म्हणजे राजकीय सूड नाही, हे देखील तितकेच खरेेेे.
अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी शुगरच्या थकीत कर्ज प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेने प्रॉपर्टीचा प्रतीकात्मक ताबा घेतला. मातोश्री लक्ष्मी शुगर माजी आमदार तथा मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मालकीचा आहे. तसेच स्वामी समर्थ साखर कारगान्याने साखऱेची विक्री केल्यामुळे डीसीसी बँकेने कारवाई केली. कारखान्याचे चेअरमन माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, उपाध्यक्ष आणि अन्य संचालक मंडळालाही या कारवाईची धग पोहोचली आहे. सांगोलेचे माजी आमदार दीपकआबा साळुंके पाटील यांनीही सहकारी साखर कारखान्यातील साखर विकली म्हणून त्यांच्यासह अन्य संचालक ज्यामध्ये भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतन केदार सावंत यांचाही समावेश आहे. बार्शीचे उबाठा आमदार दिलीप सोपल यांच्या आयर्न शुगरनेही असाच प्रकार केला आहे. त्यामुळे तिथेही डीसीसी बँकेने कारवाईची कुर्हाड चालविली आहे.
सहकार क्षेत्रातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथील सिध्दनाथ साखर कारखान्यावर थकीत 30 कोटींचे कर्ज प्रकारणी पीएनबी बँकेने जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली असून हा कारखाना माजी आ. दिलीप माने यांच्या ताब्यात आहेे. न्यायालयीन लढाईत निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेने हिरज, बेलाटी, तिर्हे, कोंडी येथील बिगर शेत जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केल्याची खबर आहे. माने सोलापूर बाजार समिती, बीएमएसबी, बीएमआयटी, डीसीसी बँक या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या संस्थांमध्येे सक्रिय आहेत.
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (अजीतदादा गट) पंधरवड्यापूर्वी सोलापूर दौर्यावर आले असता, त्यांनी माने यांच्या अंत्रोळीकर नगर येथील बँक शाखेचे उद्घाटन केले होते. तसेच होटगी रोडवरील निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला होता. या ठिकाणीही पीएनबीने दृष्टी वळवली असल्याचे समजते. विशेष म्हणजे या पाहुणचार प्रसंगी दीपक आबा साळुंके पाटील आणि राजन पाटील अनगरकर यांनीही हजेरी लावली होती. या भेटीत डीसीसी बँकेने कारवाई टाळावी अशी नेत्यांची रास्त अपेक्षा होती. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण मंत्र्यांच्या दौर्यानंतर कुठेही अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहाराच्या अनियमितता कारवाईस ब्रेक लागलेला दिसत नाही. सही दिशा स्पष्ट नीती असेच धोरण सहकार क्षेत्रात तूर्तास तरी दिसते. त्यामुळे विना सहकार नही उध्दार हे ब्रीदवाक्य घेउन कार्यरत साखर सम्राट, राजकीय नेते आणि त्यांच्या सहकारी संस्था यांनी सहकाराचा स्वाहाकार केल्यामुळे त्यांच्यावर स्वाहा होण्याची वेळ ओढवली आहे.
What's Your Reaction?






