फिक्सरना देवाभाऊचा सिक्सर
मस्ती कराल तर घरी जाल, भरला दम....

(विजयकुमार पिसे)
1995 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना स्वत:ला गरीब दाखवून दोन फ्लॅट बळकावणारे राष्ट्रवादीचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड सुनावला. त्यानंतर कोकाटे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे. प्रकरण आहे, मंत्र्यांचे पीए, पीएस आणि ओएसडी नियुक्तीचा. हा अधिकार मंत्र्यांना नाही, तर मुख्यमंत्र्यांनाच आहे. असे खडसावून कथित फिक्सरना फडणवीस यांनी सिक्सर मारला आहे.
पण त्यामुळे मंत्र्यांची कोंडी होतेय, हे खरे असले तरी मंत्रिमंडळात सारे काही आलबेल आहे असेही दिसत नाही. मंत्री आणि त्यांचे अधिकारी ओएसडी मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा फोडतात आणि बैठक़ीपूर्वीच माध्यमांना विषय कळतो. हे काही चांगले लक्षण नाही. नव्हे तर मंत्रिपदाच्या शपथ गोपनीयतेचा भंग आहे. त्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी आमच्या हातात काही राहिले नाही. पीए, पीएस आणि ओएसडीसुध्दा मुख्यमंत्रीच ठरवतात, अशी जाहीर वाच्यता केली. याचे कारण असे की बहुतेक मंत्री स्वमर्जीने पीए,पीएस, ओएसडी नेमतात. आणि तिथून सुरू होतोय भ्रष्टचार. शिंदे मंत्रिमंडळातील तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, केसरकर यांना फडणवीस सरकारची दारे बंद का झाली. हे आत्ताशी उघड होत आहे. बहुतांश निर्णय निकष धाब्यावर बसवून झालेत आणि ते निर्णय वादग्रस्त ठरले, हे जगजाहीर आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हंटरवाली भूमिका जाहीर करावी लागली.
मंत्री आणि त्यांचे पीए यांच्याविषयी मंत्रालयात जाहीर वाच्यता होते, त्यापार्श्वभूमीवर फडणवीस यांनी फिक्सर नेमू देणार नाही, अशी तंबीच मंत्र्यांना दिली आहे. आणि आताच्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्री कोकाटे यांना ते झोंबले आहे. कोकाटे यांचे दुसरे सहकारी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषीविषयक निर्णय देखील वादग्रस्त ठरले आहेत. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री सध्या अडचणीत आहेतच.
फिक्सर म्हणून ज्यांच्या नावांची चर्चा आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्या नावांना मान्यता देणार नाही, तसेच माझ्याकडे आलेल्या 125 प्रस्तावांपैक़ी 109 नावांना मंजुरी दिल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पीए,पीएस आणि ओडीएस नियुक्तीत अडवणूक झाली असे नाही. तरीही कोकाटे यांचे केकाटणे म्हणजे भविष्यात त्यांना जावे लागेल की काय? कारण गरीब दाखवून सधन कोकाटे यांनी दोन फ्लॅट बळकावल्याच्या प्रकरणात कोर्टाने सुनावलेली शिक्षा, त्यामुळे कदाचित त्यांची (अपात्र) आमदारकी गेली तर.... आणि योगायोगाने फडणवीस यांनी जास्त मस्ती कराल तर घरी जाल, असा भरलेला दम.....
What's Your Reaction?






