माजी आ.दीपकआबांच्या प्रॉपर्टीचा तिसर्यांदा लिलाव
शिवाजीराव भोसले सह.बँकेकडे (अवसायनात) 27.56 कोटींचे थकीत कर्ज प्रकरण

(विजयकुमार पिसे)
एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी सदस्य आणि मे. जवळे विद्या विकास मंडळाचे चेअरमन दीपक आबा साळुंखे पाटील (सांगोला) यांचे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक (अवसायनात)मध्ये 27.56 कोटींचे थकीत कर्जप्रकरण असून त्यांच्या जप्त केलेल्या माढा तालुक्यातील प्रॉपर्टीचा लिलाव तिसर्यांदा पुकारला आहे. यापूर्वी दोन वेळा लिलाव जाहीर केला होता, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वसुली अधिकार्यांनी कार्यवाही केली आहे.
माढा तालुक्यातील (खैराव) तीन ठिकाणच्या जमिनी शिवाजीराव भोसले सह. बँकेने कर्ज वसुलीसाठी यापूर्वीच ताब्यात घेतल्या आहेत. आणि त्यानुसार गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये जाहीर नोटीस बजावून 13 फेब्रुवारी रोजी लिलाव पुकारला होता. सांगोला तालुक्यातील जवळा शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेेकडून कर्ज घेतले होते. त्यांच्यावर अनुक्रमे 8 कोटी, 9.76 कोटी आणि 9.80 कोटी असे एकूण 27.56 कोटींचे कर्ज थकीत आहे. माढा तालुक्यात खैराव येथे 12 हेक्टर 63 आर, 15 हेक्टर 63 आर आणि 15 हेक्टर 68 आर या जमिनी गहाणखताद्वारे तारण ठेवलेल्या होत्या. कर्ज वसुलीसाठी बँकेने माढा तालुक्यातील तीन ठिकाणच्या जमिनी ताब्यात घेउन लिलाव जाहीर केला आहे. यापूर्वी दोन वेळा कार्यवाही करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे बँकेला पुन्हा लिलाव पुकारावा लागला आहे.
गेल्या तीन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे चार माजी आमदार (अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सांगोला व बार्शी) आणि एक पदाधिकारी यांचे साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँक़ांना प्रॉपर्टी जप्तीची कठोर कारवाई करावी लागली आहे. विशेष म्हणजे या दरम्यान राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील सोलापूर दौर्यावर आले होते. तेव्हा ह्या नेत्यांनी त्यांची भेटदेखील घेतली. पण कर्जवसुलीबाबत बँका कठोर झाल्या आहेत, हे सध्याचे चित्र मानले जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच मंत्र्यांचे पीए,पीएस,ओएसडी नियुक्तीबाबत मंत्र्यांना खडसावले होते. मस्ती कराल तर घरी जाल, अशी तंबी देखील त्यांनी दिली होती. त्यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुण्यात जाहीर वाच्यता केली होती. त्यामुळे गडबड केली काही खैर नाही, असेच चित्र आहे.
What's Your Reaction?






