गुडिया देखी, दुर्गा नही..
महिला नेत्यांविषयी वापरल्या जाणाऱ्या राजकीय भाषेवर पुन्हा वाद निर्माण झाला आहे. 'गुंगी गुडिया' या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय संवाद, स्त्री सन्मान आणि सार्वजनिक भाषेच्या मर्यादांवर प्रश्न उपस्थित करणारे विश्लेषण.
(विजयकुमार पिसे)
स्त्री शक्तीची अनर्गल चर्चा करणार्या राजकारण्यांना त्यांच्या दृष्टीने ती आजही "गुंगी गुडिया" वाटते. पण ही "गुडिया जेव्हा दुर्गा" होते, तेव्हा राजकारणात 'दादा'गिरी करणारांचीही फँ..फँ होते. राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेेत्रा ताई पवार यांच्याविषयी काँग्रेसी नेत्यांनी गुंगी गुडिया असे बेताल वक्तव्य करून महाराष्ट्र आता सुसंस्कृत राहिलेलाच नाही, हे अधोरेखित केले आहे. त्यामुळे सर्वप्रथम या वक्तव्याचा निषेध!
अजीतदादांच्या अपघाती निधनाचे दु:ख पचवून एक महिला पक्षाचे, राज्याचे नेतृत्व करते, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे . पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही, एवढ्यावरच गुंगी गुडिया असा निष्कर्ष म्हणजे? दुर्दैवाने महाराष्ट्रत २०१९ पासून "शिव्या"शाहींची डिक्शनरीही कमी पडेल, इतक्या शब्दांची भरमार सर्वच पक्षांच्या जबाबदार नेत्यांनी केली आहे. सुनेत्रा वहिनींविषयी हर्षवर्धन सपकाळांनी गुंगी गुडिया शब्दाचे समर्थन करून नीचतम काँग्रेसी परंपरा राखली आहे.
१९७० च्या दशकात समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिराजींविषयी "गुंगी गुडिया" असा उल्लेख करताना त्या असमर्थ आहेत, अशी टीका केली. तेव्हा १९७१ बांगला देशावरील (१९७१) विजयानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींच्या कर्तृत्वाचा "दुर्गा" या शब्दात गौरव केला. अशी 'दुर्गा भागवत' देखील महाराष्ट्राचीच.१९७५च्या आणीबाणीचा जाहीर निषेध श्रीमती भागवत यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यशवंतरावांच्या उपस्थितीत केला होता. पण..
अटलजींच्या परंपरेतील महाराष्ट्राच्या दादांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष असताना २४ मे २०२२ मध्ये खा. सुप्रियाताई यांचेविषयी ...मसणात जा, असे वादग्रस्त वक्तव्य केले, ही टीका अंगलट येताच चंद्रकांतदादानी जाहीर पत्रमाफीनामा करून स्वत:वर राळ उडवून घेतली. सुसंस्कृत पक्षाचा नेता स्त्रीद्वेष्टा देखील असतो, हे दादांचे उदा. त्याच दादांमुळे कोथरूडच्या मेधाताईंचाही राजकीय वनवास झाला.
दोन दिवसांपूर्वी पंकजाताईंनी; कंटाळा आलाय, म्हणत 'एक्झीटची भाषा का वापरली. याचा अर्थ कोणताही पक्ष अपवाद नाही.असो. यावरून शिवरायांच्या महाराष्ट्रात स्त्री शक्ती सन्मान या परंपरेला पुरुषसत्ताक जबाबदार नेत्यांकडूनच त्यांचा "गुडिया" केला जातोय, अशी कैक उदाहरणे समोर येताहेत.
सोलापुरात देखील गेल्या काही दिवसांपासून महिला शहराध्यक्षांविषयी ज्या पध्दतीने फेसबुक चालविले जाते, व्हॉटसअपवर प्रतिक्रिया येतात, मिडिया ट्रायल सुरू आहे, ह्या मागे देखील काँग्रेसी संस्कृतीच *गुरगुरतेय असावी.
गुंगी गुडिया दुर्गेच्या अवतारातच प्रक़टावी अर्थात सपकाळ सारख्या नेत्यांच्या मानसिकतेचा 'हश्र' व्हायला हवा. म्हणून सुनेत्रा ताई असो वा अन्य महिला त्यांचा मान सन्मान राखलाच पाहिजे, ही महाराष्ट्र देशाची, शिवरायांची परंपरा आहे, 'शिव्या'शाहीची नव्हे. वैचारिक घसरण होत असलेल्या नेत्यांनी याचे स्मरण करावं इतकंच...
What's Your Reaction?