मित्र पक्षांवर मेहेरनजर! काय चाललंय काय!!
मित्र पक्षांवर मेहेरनजर! काय चाललंय काय!!

(विजयकुमार पिसे)
राज्यातील शिंदे सरकार गेले दोन अडीच वर्षे चर्चेत राहिलेले. मंत्रिमंडळ विस्ताराआधी इच्छुकांना "एप्रिल फुल" केले. त्यामुळे अनेक आमदार नाराज झाले. परंतु राज्यात सर्वात मोठा भाऊ असून देखील भाजपा उपाशीच राहिला. त्यांचे दोन मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी हे मात्र तुपाशी राहिले. दोनच दिवसांपूर्वी मोहोळचे राजन पाटील अनगरकर यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आमदार नसतानाही त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला. जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार असूनही एकही जण ना मंत्री झाला, ना महामंडळ अध्यक्ष. त्यामुळे निराशा आणि हतबलता. असो..
राज्यातील अनेक महामंडळांचे अध्यक्ष जाहीर झाले. ते सर्व शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या वाटेला गेले. तीच स्थिती संसदेच्या स्थायी समितीची. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू या मलाईदार समितीचे अध्यक्ष झालेत. तसेच शिवसेनेचे श्रीरंग बारणे ऊर्जा समितीचे अध्यक्ष जाहीर आले आहेत. म्हणजे राज्यात आणि केंद्रात सब कुछ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे सामान्य कार्यकर्ताच काय, भाजपातील शीर्षस्थ नेतेही अस्वस्थ झाले आहेत. सर्वांचा एकच प्रश्न, *"काय चाललंय काय?"*
संसदेच्या २४ स्थायी समितीची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी जाहीर केली. देशातील राजकीय हवामानाची अचूक दिशा ओळखणारे तरबेज राजकारणी शरद पवार हे वन हवामान बदल समितीचे सदस्य नियुक्त आहेत. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी संरक्षण समितीचे सदस्य झाले आहेत. विशेष म्हणजे गांधी मागील टर्मध्ये लढाऊ रफाल विमान खरेदीवर, तोंडसुख घेत होते. संरक्षण विषयक अनेक घडामोडींची
माहिती त्यांच्या विदेश दौऱ्यातही चर्चेत राहिली. आणि आता राहुल गांधी संरक्षण विषयक समितीचे सदस्य आहेत. न जानो देशाची संरक्षण विषयक माहितीची खबर अन्य देशांना मिळो, ही किमान अपेक्षा. सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे परराष्ट्रधोरण विषयक समितीच्या सदस्या आहेत. जिल्ह्यातील आणखीन एक खासदार धैर्यशील मोहिते पाटील जलसंपदा विषय समितीमध्ये काम करणार आहेत. धैर्यशील यांचा जलसंपदाविषयी चांगला अभ्यास आहे. त्यांच्या जोडीला उदयनराजे भोसले, विशाल पाटील आणि अशोक चव्हाण हे देखील आहेत. दररोज सूर्योदय झाल्यावर टीव्ही चॅनलवाले ज्यांना प्रामाणिकपणे झळकवतात ते संजय राऊत रसायने व खते विषयक समितीचे सदस्य आहेत. राऊत राजकारणात अजब रसायन आहेत, हे सर्वांना कळून चुकले आहे. खासदार सुप्रियाताई सुळे, गृह विषयक समितीमध्ये त्यांची वर्णी लागली आहे. "पवार गृहकलात" सुप्रियाताई नेहमीच नेमकेपणाने टिप्पणी करतात. तर भावजय सुनेत्रा पवार महिला व बालकल्याण युवा व क्रीडा समितीमध्ये आहेत. पवार घराण्यातील तीनही सदस्यांना स्थायी समितीमध्ये काम करायला संधी मिळाली आहे, हा संसदेच्या २४ स्थायी समितीमध्ये अपवाद असावा. असो... राजकारणात पवार नेहमीच पॉवरफुल राहिले आहेत. पण सर्वसत्ताधीश असूनही भाजपाची बत्ती गुल दिसते.
हे ही नसे थोडके!!
What's Your Reaction?






