सोलापूर विमानसेवेचे मोदींच्या हस्ते आज लोकार्पण

सोलापूरच्या विकासाचा रनवे झेपावणार!

Sep 29, 2024 - 07:16
 0  499
सोलापूर विमानसेवेचे मोदींच्या हस्ते आज  लोकार्पण

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ म्हणजे सोलापूरच्या विकासाचा रनवे अवकाशात झेपावणार! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी आभासी पद्धतीने या विमानसेवेचा शुभारंभ होत असून सोलापूरसाठी ही ऐतिहासिक घटना आहे.

    सोलापूरचा उद्योग आणि सोलापुरातील बौद्धिक क्षमतावान युवा वर्गासाठी ही पर्वणी आहे.

फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हस्ते सोलापुरात सेवेचा शुभारंभ झाला. उद्योगपती विजय मल्ल्या यांची किंगफिशर ही ७२आसनी विमानसेवा काही दिवसातच बंद पडली. पुरेशी प्रवासी क्षमता नाही हे कारण पुढे करून विमानसेवा बंद झाली. परंतु हे कारण खरे नसावे. पण यामुळे सोलापूरच्या विकासाला ब्रेक लागला. (की लावला) आणि आज १४वर्षाच्या वनवासानंतर "सोलापूरच्या विकासाचा रनवे झेपावणार" आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज २९ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली मध्ये त्यांच्या हस्ते राज्यातील विकास कामांची हंडी फुटणार आहे. आभासी पद्धतीने मोदी विमान सेवा लोकार्पण करणार आहेत. या विमानसेवेमुळे केवळ ४० ते ४५ मिनिटात सोलापूरकर पुणे शहर गाठतील. एरवी रेल्वे आणि रस्ते मार्गे साडेचार ते पाच तास पुणे गाठण्यास लागतात. तो कालापव्यय आता वाचणार आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, कारखानदार, सरकारी अधिकारी आणि शिक्षण बौद्धिक क्षमतावान तसेच विद्यार्थी वर्ग यांना दिलासा मिळणार आहे.

*बोरामणी विमानतळासाठी अट्टाहास ....*

२००९ मध्ये देशात, राज्यात आणि सोलापुरात कांग्रेस व राष्ट्रवादीचे यूपीएचे ट्रीपल इंजिन सरकार होते. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे बाहुबली नेतृत्व असूनही विमान सेवेच्या नन्नाचा पाढा कायम राहिला. ही स्थिती २०१४ पर्यंत म्हणजे देशात परिवर्तन झाल्यानंतर याचा तिढा सुटण्याचा मार्ग मिळाला. मात्र पुढे साखर कारखान्याची चिमणी आडवी आली. चिमणीमुळे विमान उडणार नाही, हे कारण अधोरेखित झाले. त्यावरच गेली दहा वर्षे (२०१४ ते २०२४) हवेतच वादाच्या घिरट्या सुरू होत्या. दरम्यान शिंदे यांचे केंद्रात वजन होते, तेव्हा त्यांनी बोरामणी येथे विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले. त्यावर कोट्यवधी रुपये खर्ची टाकले. त्यासाठी अट्टाहास धरला. तसेच त्या काळात होटगी रोडवरचे विमानतळ मोडीत काढण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे तिथे अतिक्रमणही वाढले. देशात आणि राज्यात नरेंद्र आणि देवेंद्र सत्तेत आल्यानंतर होटगी रोड येथेच विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.(तसेच तेव्हा शरद बनसोडे व डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी हे भाजपाचे दोन खासदार म्हणून पाठपुरावा करतच होते) कारखान्याच्या चिमणीने विमानसेवेस ब्रेक लावला. त्यास राजकीय वळण दिले. जून २०२३ मध्ये ती वादग्रस्त चिमणी पडली. आणि आज १४ महिन्यानंतर याच ठिकाणाहून अवकाशात विमान

झेपावणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत याच चिमणीचे राजकारण करून(नरेंद्र विरोधात) काँग्रेसला फायदा देण्याचा प्रयत्न कारणी लागला. आता विधानसभा निवडणुकीतही चिमणीचे राजकारण करून (देवेंद्र विरोधात) भाजपाची कोंडी करण्याचा डाव आहे. शुक्रवारी भाजपाचे आमदारद्वय सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर विमानतळास भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे भाजप विरोधक तोंडघशी पडले आहेत. 

   सोलापुरातून विमान सेवा सुरू होत नसल्यामुळे गत १० वर्षे उद्योजक, व्यापारी, कारखानदार, आयटी क्षेत्रातील विद्यार्थी वैतागले होते. परिणामी सोलापूरची लोकसंख्या घटली. अनेक गुणवंत, बौद्धिक क्षमतावान विद्यार्थी यांनी जन्मभूमी सोलापूर सोडून रोजगारासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू हीच कर्मभूमी मानली.

आता ही विमानसेवा भविष्यात तिरुपती, हैदराबाद, बंगळुरू येथेही देता येणार आहे. त्यामुळे भाविक, उद्योजक, व्यापारी, कारखानदार, आयटी क्षेत्रातील गुणवंत यांना सोलापूरचे आकर्षण वाढणार आहे. परिणामी येथील जमिनींना सोन्याचा भाव मिळणार हे निश्चित. एकाअर्थी सोलापूरच्या विकासाचा रनवे आकाशात झेपावणार आहे.

*तिरुपती बालाजी भक्तांची सोय*

 सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यानंतर तिरुपती बालाजी दर्शनास जाणाऱ्या भक्तांची मोठी सोय होणार आहे. सोलापूरवरून तिरुपतीकडे जाणारे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. बऱ्याचदा या मंडळींना गुलबर्गा किंवा कोल्हापूर येथून विमानाने तिरुपतीला जावे लागते. परिश्रम, वेळ व पैसा आता वाचणार आहे. सोलापुरातील आयटी क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी पुणे, हैदराबाद बंगळूर येथे आहेत. या ठिकाणची सर्वाधिक संख्या सोलापूरची आहे असे सांगितले जाते, त्यामुळे आता आयटी उद्योगच येथे येईल याची खात्री दिली जात आहे. येथील तेलगू भाषिक रहिवासी तेलंगणा व आंध्र या भागातून आले आहेत. मायभूमी हैदराबादसाठी त्यांची नित्य वारी असते. सोलापूर - हैदराबाद विमानसेवेमुळे तेलगू भाषिकांना दिलासा मिळणार आहे.

*जमिनीला सोन्याचे मोल* 

सोलापूर मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर येथे आता उद्योगांसाठी जमीन मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक उद्योग सोलापुरात येऊ घालतील. पर्यायाने भविष्यात येथे रोजगाराची गॅरंटी निर्माण होईल. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, आयटी कंपन्यांंसह डाळिंब क्लस्टरचा विषय आता मार्गी लागेल. येत्या काही महिन्यात सोलापूरमध्ये ४६२कोटींचे प्रकल्प होऊ घातले आहेत. एरवी सोलापूरला नकार देणारे उद्योजक त्यांची पसंती सोलापूरच राहील. विमानसेवेमुळे हे शक्य होईल, असे उद्योजक म्हणतात.

*उडान'ची सेवा डिसेंबरमध्ये*

विमानतळाचा शुभारंभ झाल्यानंतर विमानसेवेला उशीर होऊ नये, याकरिता राज्य शासन पुढाकार घेणार आहे. 'उडान' योजनेंतर्गत विमान कंपन्यांना प्रवाशांच्या तिकिटामागे जे अनुदान मिळणार आहे, ते अनुदान राज्य शासन कंपन्यांना देणार आहे. त्यामुळे, निविदा प्रक्रिया पूर्ण पूर्ण होण्यापूर्वीच प्रातिनिधिक स्वरूपात पुणे आणि मुंबईसाठी सोलापुरातून विमानसेवा सुरू होईल. उडान अंतर्गत डिसेंबरमध्ये विमानसेवा सुरू होणार आहे. डिसेंबरपासून तिरूपती, बंगळुरू तसेच हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow