गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, शंखनादसाठी 20 हजार भाविक उपस्थित
हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच - डॉ. जयंत आठवले

स्वत: साधना करणे ही व्यष्टी साधना, तर समाजाला साधनेला लावणे, ही समष्टी साधना आहे. सनातन संस्था समष्टी साधना शिकवते. त्यामुळे आज सनातनचे 131 साधक संतपदी विराजमान झाले आहेत अन् 1 हजार साधक पुढील 10 वर्षांत संत होतील. सर्वच समाज सात्त्विक झाला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल. हिंदु राष्ट्राची स्थापना, ही समष्टी साधना आहे, त्यासाठी सर्वांनी साधना करावी, हे सांगण्यासाठी समाजात जायला हवे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी केले. गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी 20 हजारांहून अधिक साधक आणि हिंदू उपस्थित होते.
समाजात अधिकाधिक लोक सात्त्विक वृत्तीचे निर्माण झाले की हिंदु राष्ट्र निश्चित. समाजातील डॉक्टर हे केवळ शारीरिक आणि मानसिक आजारावर औषध देतात; मात्र अनिष्ट शक्तींच्या त्रासासह अनेक रोग हे स्वभावदोष, प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास यांमुळे होतात. हे त्यांना माहितच नसते. त्यामुळे या त्रासावर त्यांच्याकडे कोणतीच उपाययोजना नसते. परिणामी अनिष्ट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी नामजप अर्थात् साधनाच करावी लागते. हिंदू या शब्दाचा अर्थ हिनानी गुणानी दुषयती। स्वत:तील दोष दूर करतो, तो हिंदु होय. समाजात अधिकाधिक लोक सात्त्विक वृत्तीचे निर्माण झाले की, हिंदु राष्ट्र निश्चित येईल. आता आपत्काळ, तिसरे महायुद्ध होईल, यासाठी आपण स्वत:ला सिद्ध करावे लागेल. आपत्काळात जी युद्धजन्य परिस्थिती होईल, त्यात नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागेल.
या वेळी अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज......श्री गुरुकृपाधिपति सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी की जय या विस्तृत बिरदावलीचे वाचन करण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांनी त्यांच्या संदेशात म्हटले की, सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व संकल्प, विशेषतः धर्मसंस्थापना आणि सनातन राष्ट्र स्थापनेचे संकल्प सिद्धीस जावोत. तर या वेळी डॉ. कुंदा आठवले म्हणाल्या की, सनातनच्या कार्याला मिळत असलेली ही कीर्ती हे भक्तराज महाराज यांच्या कृपेचेच फलित आहे. इंदूर येथील गिरीश दीक्षित, शिल्पा निरगुडकर यांनी डॉ. जयंत आठवले आणि पत्नी डॉ. सौ. कुंदा आठवले यांचा विशेष सन्मान केला. या प्रसंगी आचार्य उपेंद्रजी आणि सौ. नीता, तसेच भाग्यनगर येथील नंगुनेरी चंद्रशेखर यांनीही डॉ. आठवले यांचा सन्मान केला.
What's Your Reaction?






