ना जिता सिकंदर!
पार्थ पवार, सुनील तटकरे आणि घराणेशाहीच्या राजकारणावर भाष्य करणारा विशेष लेख. संघर्षातून पुढे आलेल्या नेत्यांपेक्षा वारसदारांना मिळणाऱ्या संधींवर सवाल उपस्थित करत परिवारवादी राजकारणाची वास्तवता मांडली आहे.
2019 लोकसभेची रणधुमाळी. बारामतीकर आजोबा,पप्पा,आत्या,भाऊ अख्खी फौज मावळात. केवळ पार्थसाठी. पण पहिलवान बारणे अप्पा यांनी मावळ लोकसभेचं मैदान मारलं. पहिल्याच लढाईत पार्थची धोबीपछाड. आता मागल्या दाराने राज्यसभेचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस. घरात पक्ष असल्यामुळे न मागता अशी पदं मिळतात.
सुनील तटकरे 42 वर्षे राजकारणात. तालुका अध्यक्षापासून सुरवात. जि.प.अध्यक्ष, पाच वेळा आमदार,15 वर्षे मंत्री, दोन वेळा लोक़सभेची निवडणूक़ लढवून खासदार. म्हणून त्यांनी जाहीरपणे सुनावले, मागच्या दाराने नव्हे, निवडणूक़ लढवून खासदारकी. त्यामुळे ते जितकर सिकंदर ठरले. अपवाद पार्थ पवारांचा. ना जिता, फिर भी सिकंदर!!
आजच्या राजकारणात असे अनेक पार्थ आहेत. ज्यांच्या घरात पक्ष, त्या नेत्यांचे वारसदार. ज्यांचा कसला वारसा नाही, योगदान नाही. अशा पक्षात फुटी, त्यांची भाषा देशाच्या, समाजाच्या एकजुटीची. यांचा आदर्श काय घ्यावा. कुटुंब रंगलंय राजकारणात असं चित्र. शरदराव,सुप्रियाताई,सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार चार जण खासदार. (सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आता तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.).
दिल्लीत नेहरू/गांधी, कर्नाटकात देवेगौडा, तमीळनाडूत करुणानिधी स्टॅलिन, तेलंगणात केसीआर, आंध्रात जगन रेड्डी/चंद्राबाबू नायडू. उत्तर प्रदेश/बिहारात मुलायम व लालूप्रसाद यादव, काश्मीरात शेख अब्दुल्ला आणि महबुबा मुफ्ती आणि महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार परिवार. अशा परिवार पार्टीनं राजकारणं व्यापलं आहेे.
पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा वहिनींनी निवडणूक़ आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं वगळली. ही तांत्रिक चूक असल्याचा खुलासा झाला. पक्ष कार्यालयात तटकरे, पटेलांना जागा देखील नाही. म्हणजे ज्या नेत्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, पवार साहेब आणि अजीत दादांबरोबरीने पक्ष वाढवला. त्यांची कुठे *पत्रास ठेवली नाही. त्यामुळे कदाचित तटकरेंची ही खंत असावी. तेव्हा सडेतोड बोलून गेले मागच्या दाराने नव्हे.
What's Your Reaction?