रामजन्मभूमी मंदिर आणि पद्म सन्मान
मोदी सरकारकडून रामभक्तांची दखल, पुरोगामींची मळमळ!

(विजयकुमार पिसे)
26 जानेवारी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. यंदाच्या वर्षी पाच महनीय व्यक्तींना जो सन्मान मिळाला ते रामजन्मभूमी मंदिराशी निगडित आहेत. हा रामभक्तांचाच सन्मान मानला जातो. साध्वी ऋतुंभरा ज्या 1990 च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनात फायर ब्रॅण्ड नेत्या म्हणून ओळखल्या गेल्या. या शिवाय सर्वोच्च न्यायालयातील विधीज्ञ सी.एस.बैद्यनाथन, आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड ज्यांनी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त निश्चित केला. राम मंदिर वास्तूरचनाकार चंद्रकांत सोमपुरा आणि चित्रकार वासुदेव कामथ.
अयोध्या वादग्रस्त ढाँचा कोसळला, त्या घटनेशी संबंधित साध्वी ऋतुंभरा यांच्यावरही खटला भरला गेला. 1990 च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलन एका शीर्षस्थानी पोहोचले होते, तेव्हा साध्वी फायर बॅन्ड नेत्या आणि वक्त्या होत्या. त्यांच्या जय श्रीराम जय घोषाने विरोधकांची बोलतीही बंद झाली होती. त्या इतक्या लोकप्रिया होत्या की त्यांनी ठरवले असते तर राजकारणात मोठी संधी होती. पण त्यांनी अनाथ मुलांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले. 61 वर्षीय साध्वी ऋतुंंभरा सेवाकार्यात सक्रिय आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र सोलापुरात प्रचारासाठीच्या स्टार यादीत त्यांचे नाव होते. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून साध्वी ऋतुंभरा यांना आमंत्रित करण्याचे ठरले होते.
सर्वोच्च न्यायालयात राममंदिर जन्मभूमीसाठी बिनतोड युक्तिवाद करणारे ज्येष्ठ विधीज्ञ सी.एस. बैद्यनाथन सर्वपरिचित आहेत. 1856 ते 1949 या काळात तिथे मशीद होती, आणि नमाजही आदा केला नाही, असा कोणताही पुरावा नाही. हे बैद्यनाथन यांनी सप्रमाण सिध्द केले. वादग्रस्त जागेवर रामजन्मभूमीच आहे, हे त्यांनी न्यायालयात ठणकावून सांगितले. त्यांच्या बिनतोड युक्तिवादामुळे राममंदिर निर्माणाचा वाद निकाली लागला. वाराणसी स्थित आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड ज्यांनी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त निश्चित केला. तसेच काशी विश्वनाथ कारीडॉरचा मुहूर्त काढून दिला होता. लोकसभेसाठी मोदी यांनी वाराणसी येथून नामांकन दाखल केले होते, तेव्हा तेथील स्थानिक रहिवासी सूचक म्हणूनही गणेश्वर शास्त्री उपस्थित होते.
राम मंदिर वास्तूरचनाकार चंद्रकांत सोमपुरा यांनाही मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. देशभरातील 200 पेक्षा अधिक वास्तूंचे रचनाकार सोमपुरा आहेत. प्रभाशंकरभाई ओघडभाई सोमपुरा यांचे चंद्रकांत सोमपुरा हे नातू, वास्तूरचनाकार प्रभाशंकरभाई यांना देखील यापूवीं पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. जन्म कर्नाटकातील पण महाराष्ट्रीयन चित्रकार वासुदेव कामथ यांनी चित्रकलेला एक आयाम दिला आहे. त्यांची चित्रशैली आणि हस्ताक्षर वादातीत आहे. वासुदेव कामथ यांनी राममंदिरात भित्तीचित्रे रेखाटली आहेत. म्हणजे मोदी सरकारने समस्त रामभक्तांचा पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराने सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल तर घेतलीच शिवाय समस्त रामभक्तांना योग्य तो संदेश दिला आहे.
पुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराबद्दल आक्षेप घेतला आहे. यापूर्वीच्या सरकार काळात राजकीय पक्षांशी संबंधित आणि सैफ अली खान सारखे तारे तारकांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार खिरापतीसारखे वाटले जायचे. तेव्हा या पुरोगामी विचारवंतांची बोलती बंद होती. आता मात्र रामभक्तांचा सन्मान केल्याबद्दल पुरोगामी मळमळ सुरू झाली आहे. रावणाची लंका अशा विचारवंतांना नेहमीच प्रिय असते. ते रामभक्तांबददल गरळ ओकणारच.
What's Your Reaction?






