पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीसाठी अजित दादा गटाचा दावा!
भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष!! (विजयकुमार पिसे)

(विजयकुमार पिसे)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत तीर्थक्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मन्दिरे समितीसाठी सत्ताधाऱ्यांमध्ये चुरस लागली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे भाजपामध्ये अस्वस्थ पसरली असून ही समिती आपल्याच ताब्यात राहावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थकांच्या हालचालींकडे लक्ष लागले आहे.
२०१४ मध्ये राज्यात भाजप सेना युती सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्याने पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर भाजपा सदस्यांची वर्णी लावली. दरम्यान या समितीचे अध्यक्ष कराडचे डा. अतुल बाबा भोसले यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर (औसा) यांच्या हातात सूत्रे गेली. त्यानंतर आजतागायत श्री औसेकर महाराज मंदिर समितीचा कारभार पाहत आहेत. २०१९ मध्ये निवडणुकीनंतर राज्यात कुरघोडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनीही मंदिर समिती बदलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ठाकरे २०२२ मध्ये पायउतार झाले. त्यामुळे सत्तांतरानंतर देखील विद्यमान मंदिरे समितीला पुढील काळात देखील संधी कायम राहिली. दरम्यान फडणवीस यांचे निकटवर्तीय नाशिकचे श्री तुषार भोसले यांनी देखील मंदिरे समिती अध्यक्ष पदासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनाही यश आले नाही. तुषार भोसले भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आहेत. कोरोना काळात त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले. परंतु विद्यमान युति सरकारचा कार्यकाल संपत आला आहे . आता २०२४ मध्ये म्हणजे येत्या २ महिन्यात निवडणुका अपेक्षित आहेत, नेमकी ही संधी साधून मंदिर समितीची पुनर्रचना करण्याचे घाटत आहे. त्यासाठी
फडणवीस आणि पवार गटात चुरस लागली आहे. आता ही मंदिर समिती गठीत झाली तर विधानसभेच्या निवडणुका नंतरही ती कायम राहील असे दिसते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने दावा केला आहे. पुणे जिल्ह्यातील दादा समर्थक माजी आमदार यांचे नाव मंदिर समिती अध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याचे समजते. याशिवाय मंदिर समितीवर अन्य इछुक मंडळींचीही वर्णी लागणार आहे. त्यासाठी राज्यभरातील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीमधील सत्ताधारी मंडळी सरसावली आहेत. दादा गटाकडे मंदिरे समिती अध्यक्षपद गेल्यास पुन्हा एकदा तुषार महाराज भोसले यांना हुलकावणी मिळणार असे दिसते.
दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर राजकीय पक्षांच्या मंडळींची वर्णी लागू नये अशी मागणी असूनही राज्य सरकार त्याची कितपत दखल घेईल याविषयी साशंकता आहे.
What's Your Reaction?






