...तर तावडे जातील राज्यसभेवर!
...तर तावडे जातील राज्यसभेवर!

विजयकुमार पिसे | सोलापूर
राज्यसभेची पोटनिवडणूक येत्या 3 सप्टेंबरला होत आहे. महाराष्ट्रातील दोन्ही जागा भाजपाच्याच आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे दोघेहीे लोकसभेवर निवडून गेल्याने त्या जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन जागांसाठी अर्थातच भाजपाच्याच सदस्यांची वर्णी लागणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने राज्यात महायुती असल्यामुळे भाजपच्या वाट्यातील घास दुसऱ्या पक्षाच्या तोंडात अलगदपणे जाणार आहे. मात्र एकमेव जागेवर कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.
नवी दिल्ली येथील भाजपा सूत्रांनुसार पक्षाचे महामंत्री विनोद तावडे यांना संधी मिळेल असे समजते. दुसऱ्या जागेवर ज्या ठिकाणी सातारचे उदयनराजे निवडून आले आहेत, ती जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाईल हे नक्की आहे. तसे फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले. मात्र त्यामुळे एकाअर्थी भाजपला फटका बसणार आहे.
विनोद तावडे यांचे नाव पुढे येण्या मागचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुळवून घेतले असे समजते. आणखी दोन महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या ठिकाणी अर्थात तावडे यांना संधी देणे क्रमप्राप्त ठरले तर कदाचित भाजपा नेतृत्वाचा कौल तावडे यांच्या बाजूने जाऊ शकतो. पाच वर्षांपूर्वी तावडे यांचे तिकीट तात्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील त्यांनी कापले. त्यामुळे नाईलाजाने तावडे यांना दिल्लीत जावे लागले. राष्ट्रीय सचिव त्यानंतर महामंत्री अशा चढत्या क्रमाने त्यांना संधी मिळत गेली. दिल्लीत महाराष्ट्राचा चेहरा म्हणून तावडे ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा घसरलेला आलेख आणि विधानसभा निवडणुकीत संभाव्य धोका लक्षात घेता तावडे यांना संधी मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर, राज्याचे गृहमंत्री म्हणून तावडे यांना संधी अपेक्षित होती. परंतु ते झाले शिक्षण मंत्री. ह्या खात्याची धुरा देखील त्यांनी यशस्वीपणे हाताळली. आमदार म्हणून बोरीवली या त्यांच्या मतदारसंघात अटलजींच्या स्मृत्यर्थ उभारलेले अटल स्मृती उद्यान गौरवपूर्ण आहे. अभाविप आणि भाजपात अनेक जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या. या साऱ्या जमेच्या बाजू असताना देखील तावडे यांना विधानसभेचे तिकीट नाकारले गेले. दुर्दैवाने असा निर्णय करणाऱ्या नेते मंडळींना पाच वर्षानंतर कदाचित उपरती आली असावी. याचे कारण म्हणजे गेल्याच महिन्यात पंकजा मुंडे यांना मिळालेली विधान परिषदेची संधी. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक जेव्हा लागायची तेव्हा मुंडे आणि तावडे यांचे नाव शर्यतीत असायचे.परंतु तिथेही त्यांना कात्री लागली.
तावडेंबरोबर पंकजा मुंडे यादेखील दिल्लीत गेल्या. पक्षाचे सचिव पद काही राज्यांचे प्रभारी पद अशा जबाबदाऱ्या मिळत गेल्या. परंतु त्या स्वतःला फडणवीस यांच्या स्पर्धक समजल्या. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत घरच्या होम पिचवर त्या पराभूत झाल्या. त्यानंतर २०२४ लोकसभा निवडणुकीत देखील त्यांच्यावर नामुष्की आली. अश्या स्थितीत पंकजा यांची उपेक्षा होते. शिवाय त्यांचा ओबीसी चेहरा यामुळे नाईलाज झाला आणि पंकजा मुंडे आमदार झाल्या. अशीच स्थिती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही. बावनकुळे २०१४ते राज्याचे ऊर्जामंत्री होते. त्यांचे तिकीट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नाकारले. त्यामुळे बावनकुळे यांनाही नंतर संधी मिळाली.
दरम्यान 2019 मध्ये विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकांमध्ये भाजपाची पिछेहाट झाली. नाराज ओबीसी घटकांचा हा परिणाम. दरम्यान बावनकुळे हे देखील विधान परिषदेचेे सदस्य झाले. पाठोपाठ प्रदेशाध्यक्षही झाले. मुंडे आणि बावनकुळे यांना संधी मिळाली मात्र तावडे वंचित राहिले. आता ती कसर भरून काढणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा.... म्हणून.... राज्यसभेसाठी तावडे यांचे नाव पुढे येत आहे.
What's Your Reaction?






