भेट तुझी माझी स्मरते।
भेट तुझी माझी स्मरते।

(विजयकुमार पिसे)
एक माजी मुख्यमंत्री ज्यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची माजी मुख्यमंत्री अशी ओळख पाच वर्षापूर्वी झाली. काळाचा महिमा पहा. आज त्याच माजी मुख्यमंत्र्यांना त्याच देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यावी लागली. म्हटलं तर सूड म्हटलं तर आसूड. मंगळवारी नागपूर अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा अन्वयार्थ काहीही काढा. कवी मंगेश पाडगावकर यांचं हे गीत अरुण दाते यांनी गायलं होतं. त्या अवीट गीताची आठवण आज पुन्हा झाली.
या गीताच्या ओळी अशा.....
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची।
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास।
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास॥
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची।
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची।
या चार ओळीतच ठाकरे आणि फडणवीस यांची पूर्वमैत्री, युती, विजय आणि पुढे...
हा पाच वर्षापूर्वीचा पट समोर येतो.
ठाकरे आणि फडणवीस यांची आजची भेट. आणिे एक माजी मुख्यमंत्री एका माजी मुखयमंत्र्यांना भेटतो. भूत आणि वर्तमानकाळ आठवला तर. सारं काही लक्षात येतं. या भेटीची मंगळवारी दिवसभर चर्चा होती. उपराजधानी नागपूरची बोचरी थंडी आणि भेटीची गरमागरम चर्चा. इतकी की तिकडे देशाची राजधानी दिल्लीत आज एक़ देश, एक निवडणूक हे विधेयक लोकसभेच्या पटलावर आले. त्याचा कसलाच मागमूस मराठी वृत्तवाहिन्यांना नव्हता. असो.
ठाकरे आणि फडणवीस यांची भेट तशी औपचारिकच. ना खबर ना सुगावा. ठाकरे विधानभवनात दाखल झाले. त्यांची पावले मुखयमंत्र्यांच्या कार्यालयाकडे वळली, तसे कॅमेरेही फिरले. सात, आठ मिनिटाच्या भेटीत काय चर्चा झाली, याचा तर्क ज्यानी, त्यांनी लावला. काहींनी तर परभणी हिंसाचार, इव्हीएमशी भेटीचे तार जोडले.
आपण वरील काव्यपंक्तीकडे वळू. भेट तुझी माझी स्मरते. अजून त्या दिसाची. जेव्हा (2019) भाजपा आणि शिवसेना युती होती. दोघांची मैत्रीही घट्ट होती. इकडचे उमेदवार तिकडे, तिकडचे उमेदवार इकडे. तसेच जागांची व उमेदवारांची अदलाबदल. अन्य पक्षातील इनकमिंगचीही सोय. निवडणुका पार पडल्या. युतीला बहुमत देखील मिळालं. पण.... तिथून दिस फिरले. संजय राउतांनी पणच केला होता, साहेबांना सीएम करायचं. आणि साहेबांचाही पण होता, माझ्या शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचं. पुढं झालं काय? शिवसैनिक नव्हे तर साहेब झाले सीएम. (मातोश्रीचं स्वप्न असं पूर्ण केलं) पुढे अडीच वर्षानंतर फडणवीसांनीच शिवसैनिकाला (एकनाथ शिंदे) सीएम करून दाखवलं. बाळासाहेब ठाकरेंचं खरं स्वप्न पूर्ण केलं.
2024 च्या निकालानंतर एकनाथ शिंदे आढेवेढे घेत होते. या दरम्यान फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन केला. संपर्क झाला. महायुतीचा सेतू अभेद्य राहिला. आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण 2019 मध्ये. तेव्हा युतीला बहुमत मिळालं, भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या. रौतांच्या हट्टाखातर आणि सिल्व्हर ओकच्या इशार्यानुसार खेळ सुरू होता. ठाकरेंनी फडणवीसांचा फोन रिसीव्ह केला नाही. (शिंदेंंप्रमाणे ठाकरेंनीही फडणवीसांचा फोन घेतला असता तर?) मात्र (2019) पुढील इतिहास समोर आहे. आणि आज तेच ठाकरे, ज्यांची, आज माजी मुख्यमंत्री अशीच ओळख आहे.
ठाकरे आणि फडणवीस यांच्या (त्या न झालेल्या) भेटीची
आणि त्या काव्यपंक्तीची पुन:रुक्ती....
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास।
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास॥
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची।
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची।
या काव्यपंक्तीस अनुसरून पाच वर्षापूर्वी आणि आज पाच वर्षानंतर....
....भेट तुझी माझी स्मरते।
What's Your Reaction?






