पुन्हा ठेंगा!

सातारा, पुण्यानेच भरला बॅक़लॉग; गुणवंत रवींद्र चव्हाण, मुनगंटीवार नापास! केसरकर, सत्तार, सावंत यांच्या नकारातच यश

Dec 15, 2024 - 19:02
Dec 16, 2024 - 11:16
 0  558
पुन्हा ठेंगा!

(विजयकुमार पिसे)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमुक मंत्र्यांची संभाव्य यादी आमच्या हातात, ही ब्रेकींग न्यूज आता येणार नाही. कारण अशा बातमीचे सूत्र म्हणजे उगाच आपला टाईमपास. पण गेले अनेक दिवस वेळकाढू मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. याचे प्रथमदर्शनी सोलापूरसाठी मूल्यमापन म्हणजे सोलापूरकरांना पुन्हा ठेंगा! पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे आणि सातारा. येथेच आठ मंत्री झाले तर सोलापूरला ठेंगाच मिळणार दुसरं काय? दुसरी नकारात्मक बाजू म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच अव्वल ठरलेले रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार मंत्रिपरिषदेचे सदस्य म्हणून नापास. आणि नकारातच यश म्हणजे दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना ब्रेक.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास महाविलंब लागला, याचे महाखापर कदाचित दिल्लीश्‍वरांवरच फोडले जाईल. एकनाथ शिंदे यांचे ठरत नव्हते. आणि त्यांचे सहकारी कोण असावेत, हे देखील त्यांना ठरवता येत नव्हते. भाजपाने देऊ केलेली खाती आणि सहकारी कोण हे त्यांच्यासमोरचे महाआव्हान. त्यामुळे विस्तार लांबला हे मुख्य कारण असू शकते. शिंदेंनी अडीच वर्षाचा फॉर्म्युला समोर आणला. अजीतदादांनाही हा फॉर्म्युला पसंत पडला. भाजपानेही हा फॉर्म्युला स्वीकारला तर उत्तमच. म्हणजे तेच तेच चेहरे पुन्हा पुन्हा आणि नवोदितांना संधी म्हणजे दूर-दर्शन. 

39 मंत्र्यांचा शपथविधी तब्बल 33 वर्षानंतर नागपुरात झाला. उपराजधानी म्हणून नागपूरचा हा तसा सन्मानच. 5 डिसेंबरनंतर कधी होणार विस्तार म्हणून चॅनल्सवर रोज नवीन तारीख, आणि संभाव्य मंत्र्यांची यादी झळक़ायची. त्यास 10 दिवसांनी फुलस्टॉप लागला.

   सोलापूरचा पालकमंत्री झालाच पाहिजे, ही सोलापूरकरांची मागणी. मंत्रिमंडळात सोलापूरला ठेंगा म्हणजे पालकमंत्रीपदासाठीही मोठ्ठा भोपळाच. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही चांगले ठाऊक आहे, तिथे सोलापूरला गिनत नाहीत. त्यासाठी कुणीही लॉबिंग करीत नाही. हे विशेष. पालकमंत्रीबाबत सोलापूरला नेहमीच उपरेपणाची वागणूक मिळते. त्यामुळे कुणीही पालकमंत्री होवो, तोच सोलापूरच्या विकासाचे लचके तोडतो. (केवळ एक़ उदा. दत्तात्रय भरणे. उजनीचे पाणी बारामती, इंदापूरला पळवणे). आता देखील पालकमंत्री म्हणून दादा (पाटील) काय आणि (भरणे) मामा काय. फरक नाही पडत. पण सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा कशा गमावल्या, त्याचे हे ठळक़ उदाहरण. 

  भाजपाचे ठाणेदार म्हणून रवीद्र चव्हाण यांची ओळख. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून सरस कामगिरी. सुधीर मुनगंटीवार भाजपाचे आणि मंत्रिमंडळाचे यशस्वी प्रवक्ते. या दोन गुणवंतांना बाहेर का ठेवले? न पेक्षा 2014 च्या मंत्रिपरिषदेतील एका मंत्र्याची एका टेंडर प्रकरणामुळे मोदींची खप्पामर्जी. त्यामुळे त्यांना (विजेचा) जोरात शॉक बसला. आणि पुढे त्यांना आमदारकीही नाही. आता मात्र देवाभाऊंच्या बरोबरीने ते मंत्रिपरिषदेत. रविवारी मंत्री म्हणून शपथ घेताना त्यांच्या समर्थकांनाही (विजेचा) शॉक बसला म्हणे. दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना पुन्हा संधी नाकारली यात भाजपाचे मोठे यश. केसरकरांचे शिक्षण आणि गणवेश, सत्तारांचे भूखंड व सावंतांच्या आरोग्याची चर्चा खूप झाली. यातच सारे सामावले. देवाभाऊंंचे नवे सहकारी मंत्री आणि मंत्रिमंडळास शुभेच्छा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow