सेवेमुळे समाजात विश्वास निर्माण होते – सरसंघचालक
सेवेमुळे समाजात विश्वास निर्माण होते – सरसंघचालक

पुणे : समाजात सर्वकाही वाईट चालल्याची भावना निर्माण झाली आहे. पण प्रत्यक्ष वाईटाहून ४० पट अधिक चांगले सेवाकार्य समाजात चालू आहे. त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे. कारण सेवेमुळेच समाजात शाश्वत विश्वास निर्माण होतो, असे प्रतिपादन सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत यांनी केले.
भारत विकास परिषद विकलांग केंद्राच्या रौप्य महोत्सव वर्षाच्या सांगता कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती होते, असेही सरसंघचालक राज्यस्तरीय दिव्यांग शिबिराचे उद्घाटनप्रसंगी म्हणाले.
खराडी येथे आयोजित यानिमित्त राज्यस्तरीय मोफत दिव्यांग शिबिरात तब्बल १२०० दिव्यांगांना मॉड्युलर कृत्रिम हात व पाय बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात येत आहे. सरसंघचालक पुढे म्हणाले की, काही अंशी अहंकार ही माणसाला कार्य प्रवृत्त करण्यास आवश्यक प्रेरणा ठरते. परंतु, त्या पलीकडे येते ती शाश्वत प्रेरणा. ती चिरंतन असते. त्यातून निर्माण होणारा सेवाभाव म्हणजे सेवानिष्ठांची मांदियाळी होय.
या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता चितळे, सचिव राजेंद्र जोग, केंद्र प्रमुख विनय खटावकर, ढोलेपाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात निता ढेकणे, शशिकांत बोरसे, अर्जुन सोनावणे, अनिकेत गाडेकर, वैजनाथ गोरख आणि नासिर शेख या दिव्यांगांना अत्याधुनिक मॉड्यूलर पाय प्रातिनिधीक स्वरूपात प्रदान करण्यात आले. मॉड्यूलर फूटबद्दल सुमित भौमिक यांनी तांत्रिक माहिती दिली विनय खटावकर यांना पहिल्या ‘दिव्यांग मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन, तर दत्ता चितळे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी भारतीय सैन्यात सेवा बजावलेले सैनिक ज्यांनी पॅरॉलॉंपिक खेळात विशेष कामगिरी बजावली आहे अशा सैनिकांचा सन्मानही श्री. भागवत यांच्या हस्ते विजयकुमार कारकी, चार सुवर्ण पदक विजेते व्हिलचेअर बास्केटबॉल चॅम्पियन मीन बहाद्दूर थापा आणि एअरक्राफ्ट्समन मृदूल घोष यांचा सन्मान केला.
▪️गिनिज बुक रेकॉर्डचा प्रयत्न -
दिव्यांगांना एका शिबीरात आत्तापर्यंत ७१० कृत्रिम पाय बसविण्याचा विश्व विक्रम आहे. तो मोडित काढत एक हजार २०० दिव्यांगांना मॉड्यूलर पाय बसविण्याचा विक्रम भारत विकास परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
What's Your Reaction?






