आ.सुभाषबापू आणि म्हेत्रेंचा जुना दोस्ताना!

बापूंची पहिली एमएलसी म्हेत्रेंनी जिंकून दिली, तेव्हा तानवडे होते आमदार! तशीच ताकद काकानी आपल्या भाचाला दिली होती. एपीएमसी निवडणुकीत भाजपाला काँग्रेस, राष्ट्रवादीचेही मिळाले बळ, सत्ताधार्‍यांना लागेल कळ? शिवसेनेही घेतली उडी। टायगर अभी जिंदा है : म्हेत्रे

Apr 18, 2025 - 08:54
 0  427
आ.सुभाषबापू आणि म्हेत्रेंचा जुना दोस्ताना!
बापू... अण्णा... जुना दोस्ताना घडवणार पुन्हा इतिहास

(विजयकुमार पिसे)

राजकारणात वैर कायमचे नसते. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र कधीही होऊ शकतो. याची प्रचिती सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत येत आहे. शिवाय जुना दोस्ताना प्रसंगी कामाला येतो. त्यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सुभाषबापूंना स्वामी समर्थ प्रसन्न झाले. अक्कलकोटचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि सुभाषबापू देशमुख यांची भेट झाली. त्यांची भेट म्हणजे बापूंसाठी दुग्धशर्करा योग. कारण सुभाष देशमुख यांची पहिली एमएलसी म्हेत्रेंनीच जिंकून दिली होती. असा आहे, त्यांचा जुना दोस्ताना....

    सोलापूर एपीएमसीच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांच्या बाजूला प्रस्थापित नेतेे आणि मोठी ताकद आहे.त्यामुळे कौल त्यांच्या बाजूनेच अपेक्षित आहे. पण अशी तशी हार का मानायची. हे गणित सुभाष देशमुख यांचे असावे. आणि यासाठी त्यांचा जुना हिशेब समोर आहे. त्यामुळे हा जुना हिशेब पुन्हा एकदा चुकता केला तर जायंट किलर ठरेल....काल आ.विजय देशमुख यांच्यासमवेत चाय पे चर्चा झाली. काळजापूर मारुती प्रसन्न झाला. म्हणजे सारे विघ्न दूर होतील, असा दावा केला जातो. बाजार समितीच्या निवडणूक प्रचारात भाजपा कार्यकर्त्यांचे पॅनल असलेल्या सिध्देश्‍वर परिवर्तन पॅनलसाठी काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि राष्ट्रवादीचे बळीराम काका साठे यांनीही साथ देण्याचा निश्‍चय केला. वर नमूद केल्याप्रमाणे राजकारणात विशेषत: सहकारात पक्षीय जोडे बाहेर ठेवले तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू... याची अनुभूती येते. गेल्या टर्ममध्ये भाजपाचे आ. विजयकुमार देशमुख यांनी सहकाराचा असाच मंत्र जपला. ते बिनशर्त आणि बिनविरोध सभापती शेवटपर्यंत राहिले. दरम्यान दिलीप माने यांनी सभापतीपदाची खुर्ची मिळवायचा प्रयत्न केला, तेव्हा मानेंसोबत असलेले संचालकच देशमुखांकडे कायमचे राहिले. असो... म्हणजे राजकारणात वैर कायमचे नसते....

    सुभाषबापू आणि सिध्दाराम म्हेत्रे यांचा जुना दोस्ताना विधान परिषद (1997)निवडणूक काळातला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपा,शिवसेनेकडे जेमतेम 100 मते असताना काँग्रेसचे (एकत्रित सोनिया/शरद पवार) आ. युनुसभाई शेख पराभूत झाले. काँग्रेसची सर्वाधिक मते फुटून बापूंच्या पारड्यात पडली. आणि अर्थपूर्ण उमेदवार म्हणून सुभाष देशमुख यांची ओळख झाली. या निवडणूक़ स्टॅटेजीचे मास्टर माईंड होते, तत्कालिन खासदार लिंगराज वल्याळ. त्यांनी चाणक्य नीती अवलंबली. म्हेत्रे तेव्हा जि.प.सदस्य होते. त्यांच्या ताब्यात दुधनी, मैंदगी आणि अक्कलकोट नगर पालिका (स्व.सुरेश पाटील) व पंचायत समिती होती. म्हेत्रेंच्या पहिल्या भेटीत या भागातील बहुसंख्य काँग्रेसी मते सुभाष देशमुख यांनाच पडतील याची गॅरंटी सातलिंगप्पा आणि सिध्दाराम म्हेत्रे पितापुत्रांनी घेतली. या सार्‍या घडामोडी आणि भेटीप्रसंगी "मी" देखील उपस्थित होतो. (निवडणूक व्यवस्थापन संचालन समिती) तेव्हा बाबासाहेब तानवडे अक्कलकोटचे आमदार होते. निवडणूक़ स्टॅटेजी म्हणून तानवडेंना सोबत घेतले नव्हते. पण पंचप्पा कल्याणशेट्टी (आ.कल्याणशेट्टी यांचे पिताश्री) यांची मध्यस्थी कामाला आली. म्हेत्रे परिवाराच्या गॅरंटीनंतरच विधान परिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला. अशीच गॅरंटी भाच्यासाठी काका साठे यांनीही दिली होती.पुढे विधान परिषदेचा कौल कसा लागला, हा (1997) इतिहास आहे. 

  सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत तशी बापूंची पाटी कोरी आहे. पण जुना दोस्ताना कामाला आला. म्हेत्रे आणि साठे यांच्या ताकदीचा उपयोग झाला तर यू टर्न निकाल लागू शकतो. पण या निमित्ताने म्हेत्रे आणि काका साठे यांच्यासाठी टायगर अभी जिंदा है। जे बार्शी विधानसभा निवडणुकीत झाले. आ.राऊत पराभूत आणि सोपल यांची जीत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow