सेक्युलर बावनकुळेंचा भाईचारा
सेक्युलर बावनकुळेंचा भाईचारा

(विजयकुमार पिसे)
क्रूरकर्मा औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन झाले, त्याचे पडसाद सोमवारी सायंकाळी नागपुरात उमटले. प्रार्थनास्थळात सायंकाळची प्रार्थना झाल्यानंतर हिंसाचारास सुरवात झाली. ठराविक भागात हल्लाबोल केला. हिंदूंची घरे, दुकाने, वाहने यांची वेचून नासधूस झाली. पण हिंदू समाजाचे दुर्दैव हे की भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि नागपूरचे (कार्यक्षम?) पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे इतके सेक्युलर आहेत की त्यांनी भाईचाराचा पाठ सांगितला. शांतताप्रिय नागपूरकरांचा इतिहास सांगितला. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही सेक्युलर राज्यकर्ते असल्याची खात्री आता पटली आहे. शिवाय बावनकुळे फडणवीसांचे अतिविश्वासू असल्यामुळे त्यांना दुसर्या क्रमांकाचे (महसूल।) खाते आणि नागपूरचे पालकमंत्री नियुक्त करून नामानिराळे राहिलेत की काय?
नागपूरच्या दंगलीवर त्यांनी जे वक्तव्य केले ते असे होते... नागपूर के इतिहास मे हम सभी हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई सारे हम भाई भाई जैसे रहते है। हम सभी लोक एक साथ त्यौहार मनाते है। दंगा कुणी केला, कुणी घडविला, हानी कुणाची झाली. हे माहीत असूनही पालकमंत्री बावनकुळे जणू इफ्तारपार्टीची भाषा सांगत होते. त्यामुळे समस्त नागपूरकरांना त्यांच्या सेक्युलर भाईचारा उपदेशांनी निश्चित पश्चाताप झाला असेल. नागपूर संघाचे मुख्यालय. ज्या भागात दंगल झाली, तो महाल परिसर. बावनकुळे हे विसरले असावेत की काय? राष्ट्रीय स्तरावरील एक जबाबदार सर्वात मोठ्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांची गुळगुळीत भाषा. पालकमंत्री म्हणून बावनकुळे यांची भूमिका संशयास्पद वाटते. त्यांनी आणखी एक शोध लावला. दंगा करणारे आणि हिंसा करणारे बाहेरचे लोक आहेत. (बांगलादेशी तर नव्हते). त्या समाजाचे नाव घेतले नाही. दुर्दैवाने मंगळवारी जो सूत्रधार सापडला तो नागपूरचाच निघाला. बावनकुळे यांच्या वक्तव्याचा भाजपाप्रेमींनी समाज माध्यमातून समाचार घेतला, तसेच जी पोस्ट व्हायरल झाली, त्यातही बावनकुळेच लक्ष्य आहे.
पंडित नेहरूंपासून स्वतंत्र भारताचा भाईचारा आम्ही ऐकत आलो आहोत, भाईचाराची ही भाषा समजण्यापलीकडे आहे. पण दुर्दैवाने राज्यात भाजपा चालवणारे पक्षप्रमुख आणि महसूलमंत्री शिवाय उपराजधानी नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बावनकुळे हे बावनकशी नाहीतच, त्यांच्या सेक्युलर भाईचारांनी समस्त हिंदूजनांचा भ्रमनिरास झाला आहे. वास्तविक नागपुरात दंगल आणि हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, हे गृहमंत्रालय आणि पालकमंत्री म्हणून अपयश आहे. याची जबाबदारी त्यांनी स्वत:वर घेतली पाहिजे आणि कठोरात कठोर भूमिका मांडणे आवश्यक होते. पोलिसांवर हल्ले झाले. तीन उपायुक्तांसह 34 पोलीस जखमी झाले. शिवाय आज मंगळवारी धक्कादायक माहिती पुढे आली. पोलीस ठाण्यासमोर जिंदाबादच्या घोषणा केल्या. महिला पोलीस कर्मचार्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हा संतापजनक प्रक़ार. (मुंबईत यापूर्वी असाच एक हिंसाचार झाला होता, त्यातही पोलीस आणि महिला कर्मचारी लक्ष्य होते, त्याची उजळणी भाजपा नेते नेहमी करून देतात). दंगल आणि हिंसाचार करणारे समाजकंटक आहेत. ते कोण आहेत, आणि त्यांनी पूर्वनियोजित ती घडवून आणली, शिवाय हिंदूंची घरे लक्ष्य केली, हेही बावनकुळे यांना दिसले नाही की समजले नाही. की महात्मा गांधी यांच्या भूमिकेतील डोळे, कान आणि तोंड बंद केलेली प्रतिकृती होय.
नागपूर मध्यचे भाजपा आमदार आणि बावनकुळे यांचे सहकारी आ.प्रवीण दटके दंगलखोर कोण होते, त्यांनी काय केले, हे रोखठोक सांगितले. पुराव्यासाठी फोडलेले सीसीटीव्ही दाखवले. एकाच पक्षाच्या दोन जबाबदार लोकप्रतिनिधींचे विरोधाभास वक्तव्य पाहता पालकमंत्री बावनकुळे उघडे पडले आहेत. ते पक्के सेक्युलर आहेत. त्यांचा भाईचारा हिंदूंसाठी उपदेशाचा डोस असून त्यामुळे समस्त हिंदू जणांचा भ्रमनिरास झाला आहे.
What's Your Reaction?






