महायुतीत अडथळ्याची शर्यत, भाजपाला शिंदे नडणार
घड्याळाचीही किटकिट, इनकमिंग शर्यतीचा वाढता तणाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार;ठाकरे बंधूंकडे आहे लक्ष?

(विजयकुमार पिसे)
न पेलणारे बहुमत अशी स्थिती महायुतीची. समोर एकही विरोधक असता कामा नये, हे भाजपाचे धोरण. आमचाही पक्ष वाढला पाहिजे, असे शिंदे, अजीतदादांना वाटणे रास्तच. म्हणून इनकमिंगची शर्यत. यामुळे महायुतीत गतिरोध निर्माण होत आहे. ताकीद देउनही कोकाटेंचे केकाटणे नाही थांबले, धुळ्यात डाक बंगल्यात कोटींचे घबाड. नाशिकच्या बडगुजरांना भाजपात घेण्यास आ.सीमा हिरेंचा विरोध!गृहमंत्रालयाचा वाढता क्राईम ग्राफ. याचा अर्थ काय? देवाभाऊन्समोरची पुढील आव्हाने.
नाशकात पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा, त्याआधी निवडणुकांचा कुंभ जिंकण्याचा भाजपाचा "पण". म्हणून इनकमिंग जोरात. त्यात शिंदे सेनाही मागे नाही. अजीतदादांच्या घड्याळाचीही किटकिट यामुळे महायुतीत गतिरोध निर्माण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजपाला सोपी जाणार नाही.
एकला चलो रे भूमिकेत भाजपा असून, पहिल्याच घासाला शिंदे सेना नडणार आहे. राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत, पेलणे अवघड होत असून आज शरद पवार शांत आहेत, असे प्रथमदर्शनी दिसते. पण त्यांनी पुन्हा डाव मांडला आणि मुंबईसाठी ठाकरे बंधू एक़ झाले तर?
पहिले उदाहरण, गेल्या दोन दिवसात नाशकात झालेल्या घडमोडी. ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीसांना भेटले. पाठोपाठ त्यांनी ठाकरेंवर नाराजी जाहीरही केली. आणि अपेक्षेप्रमाणे पक्षातून हकालपट्टी झाली. लगेचच भाजपात खदखद बाहेर पडली. त्यांना भाजपात घेण्यावरून. ही अस्वस्थता राज्यात इतरत्रही आहेच. आपल्या समोर एक़ही विरोधक नको म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत इनकमिंग जोरात सुरू. आ.सीमा हिरे यांनी केलेला विरोध हे ताजे उदाहरण.
सोलापुरात काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे शिंदेंच्या साक्षीने धनुष्यबाण घेत आहेत. त्यांचे लक्ष्य काँग्रेस नव्हे तर भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी आहेत. म्हेत्रेंनी काँग्रेस सोडली तरी स्थानिक काँग्रेसी पाय रोवून आहेत. म्हणजे काँग्रेसचा विरोध भाजपाच्या पाचवीलाच पुजलाय. यामध्ये शिंदे सेनेची भर, ती भाजपालाच महागात पडण्याची भीती. हे लोण अक्कलकोट मतदारसंघापुरतेच नाही. सोलापूर महापालिकेतही येईल. महापालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत इनकमिंगमुळे भाजपात वाढलेला फुगवटा, त्याला वाट मोकळी करून देतील निष्ठावंत 'भाजपा'ई. कारण 'इनकमिंग'ला तिकीट मिळण्याची 'गॅरंटी' दिसते, तेव्हा ह्या निष्ठावंत भाजपाईंची पसंती धनुष्यबाणच. तिथे शिंदे सेना भाजपालाच नडणार.
वर फडणवीस एकनाथ शिंदेंना दमात घेत असतील तर हरकत नाही. पण गावपातळीवर शिंदे सेना मजबूत होत आहे. अर्थात ही लढाई महायुतीतच होण्याची चिन्हे आहेत. अजीतदादांच्या घड्याळाचा गजर वाढवायचा आहे. त्यांचे पश्चिम महाराष्ट्रात अधिक लक्ष असून पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागात अजीत दादा चंद्रकांतदादांना कधीही भारीच पडणार. शिंदे सेनेचे आक्रमक नवे शिलेदार रवींद्र धंगेकर आणि मनसेची ताकद असा चक्रव्यूह भाजपाला भेदायचाय.
मुंबई आमचीच हा भाजपाचा नारा प्रत्यक्षात आणण्यात अंतर्गत कारणे अनेक आहेत. निष्ठावंत शेलारांना पक्षाचा ताबा सोडायचा नाही आणि फडणवीसांच्या दरेकरांना दम नाही. ठाकरेंचे लक्ष्य फक्त मुंबई. त्यासाठी कदाचित बंधू"राज" सोबत येतील. तेव्हा "शिवसेना" "मन"से लढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या की लांबवल्या गेल्या? त्या जितक्या लांबल्या आहेत, त्याचा फटका भाजपलाच बसला तर? म्हणून...।
What's Your Reaction?






