चार आमदार असूनही भाजपाला मिळणार फक्त दक्षिणा

हे देवाभाऊना मान्य कसे? काँग्रेससमोर ही लाचारी का? कार्यकर्ते अस्वस्थ, लहान भाऊ म्हणजे अपमानच! सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक निर्णायक

Apr 16, 2025 - 00:23
 0  654
चार आमदार असूनही भाजपाला मिळणार फक्त दक्षिणा

(विजयकुमार पिसे)

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाचे अस्तित्व किती हा मुद्दा ऐरणीवर आला असून पक्षाचे चार आमदार असूनही फक्त नावालाच दक्षिणा आणि काँग्रेसजणांना महाप्रसाद. देशात, राज्यात आपण मोठे भाऊ, पण काँग्रेससमोर लाचारी का? असा सवाल कार्यक़र्ते करीत आहेत. तरीही हे देवाभाऊना मान्य आहे का? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, भाजपा स्वाभिमान गहाण टाकणार की अस्तित्व पणाला लावणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

   आ. सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.देवेंद्र कोठे हे चार आमदार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आहेत. ते एकीने गेले तर ताकद मोठी. पण काँग्रेसबरोबर जाण्याचा मार्ग आत्मघातकी ठरू शकतो. अशा स्थितीत भाजपाच्या वाट्याला जागा मिळणार किती, आणि कार्यकर्त्यांनाच न्याय, की प्रस्थापितांनाच संधी असा मार्मिक सवाल आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूरचे आ.सुभाषबापू यांनी केवळ कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवणार, अशी भूमिका घेऊन अस्तित्व पणाला लावले आहे. त्यांना पक्षाचे किती आमदार साथ देणार याचीही उत्सुकता आहे. 

   दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील दोन जि.प. मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात बाजार समिती आहे. गतवेळची निवडणूक शेतकरी प्रभावित होती, त्यामुळे ती भाजपानुकूल होती. सहकार क्षेत्रात काँग्रेस आणि शरद पवार गटाची ताकद आहे. सोसायटी मतदारसंघात ते बाहुबली असले तरी बहुतांश ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत. शिवाय व्यापारी गटातही भाजपा अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर आघाडी किंवा युती केली तरी भाजपाच्या वाट्याला किती जागा मिळणार? सभापती भाजपाचा होणार का? याविषयी उलट सुलट चर्चा आहे. देशात आणि राज्यात भाजपा मोठा भाऊ, इथे मात्र लाचारी पत्करणे, काँग्रेसच्या मागे परफट करून घेणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. 

    पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी मध्यस्थी करून काँग्रेसचे नेते दिलीप माने, काका साठे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांनी आपले मतभेद विसरून एकत्र आले आहेत. (कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे.) या उलट भाजपाची स्थिती आहे. पालकमंत्री गोरे, आ. कल्याणशेट्टी, आ.देवेंद्र कोठे तसेच शहाजी पवार आणि अविनाश महागावकर एकत्र आले आहेत. आ.सुभाष देशमुख यांनी पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी "एकला चलो रे" चा नारा दिला असून त्यास तमाम कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा दिसत आहे. माजी सभापती आ. विजयकुमार देशमुख या प्रक्रियेत कोठेच दिसत नाहीत, शिवाय निवडणूकही लढवणार नाहीत, मात्र व्यापारी गट आणि हमाल तोलार गटात आपले वजन टाकणार आहेत. त्यामुळे आज दुपारनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार असून फडणवीस खरोेखरच लक्ष घालणार असतील तरच पक्षाचे हित दिसून येईल. अन्यथा मिळणार्‍या दक्षिणेवर भाजपाला समाधान मानावे लागेल.   

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow