ऑगस्टमध्ये मनपा निवडणूक आचारसंहिता? आठवडाभरात प्रभाग रचना

मनपा निवडणूक स्वबळावरच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आयोगाची घाई, आचारसंहिता ऑगस्टमध्ये लागली तरी पावसाळ्यात निवडणुका सुरळीत पार पडतील का?

Jun 10, 2025 - 00:28
 0  174
ऑगस्टमध्ये मनपा निवडणूक आचारसंहिता? आठवडाभरात प्रभाग रचना

(विजयकुमार पिसे)
  राज्यातील गत पाच वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता कधी लागणार याची उत्सुकात ताणली जात असून सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक भावी मेंबर मंडळींनी देव पाण्यात ठेवले आहेत. आणि होऊ द्या खर्च असा आग्रह धरला जात आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकांच्या तयारीला लागा असे सांगताना स्वबळाचाही कानमंत्र दिला आहे. त्यामुळे सोलापुरात भाजपा स्वबळावरच लढणार हे निश्‍चित मानले जात आहे. स्थानिक भाजपा नेत्यांचाही स्वबळाकडेच कल आहे. 2017 मध्ये भाजपाने स्वबळावरच निवडणूक़ लढवून बहुमताने प्रथमच सत्ता आणली, आताही तोच  कित्ता अपेक्षित आहे. 
     मुंबईत एक सदस्यीय तर सोलापूऱसह अन्यत्र बहुसदस्यीय प्रभाग रचना असे नियोजन असून गेल्या आठवड्यात निवडणूक़ आयोगाने शासनाकडे प्रभाग रचनेविषयी विचारणा केली होती. या आठवडाभरात ती निश्‍चित होईल, असे मानले जाते. 2017 मध्ये पुणे, सोलापूर व अन्यत्र चार सदस्यीय प्रभाग रचना होती. यंदा काही प्रभाग वाढण्याची शक्यता आहे. ते गृहित धरले तर प्रभाग रचनेत फेरफार करावे लागतील. या आठवडाभरात याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल. ती पार पडली तर निवडणूक प्रक्रियेला  वेग येईल. याशिवाय जि.प., न.पा. आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाही या काळात होणार आहेत. आधी मनपाच्या नंतर ग्रामीण व निमशहरी भागात निवडणुका होतील.
    दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माहितीनुसार आगामी निवडणुकांची आचारसंहिता ऑगस्ट महिन्यात लागणार आहे. निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे आहे. कमळ या चिन्हावर निवडणूक लढणार्‍या एकाही कार्यकर्त्याला या निवडणुकीत पराभूत होऊ द्यायचे नाही, हा संकल्प आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण, शेतकरी वीजबिल माफ हे निर्णय आपल्या सरकारने घेतले ते लोकांपर्यंत पोहोचवा. केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकीट मिळणार नाही, नेत्यांपुढे चमकोगिरी करू नका, असे बावनकुळे म्हणतात. पण ते कोणाला उद्देशून? कारण तिकीट आणण्याचा हाच राजमार्ग आहे.
    वास्तविक तिकीट देताना निवडून येणे हा निकष आहेच. पण नेत्यांना काही कार्यकर्त्यांची मर्जी देखील सांभाळावी लागते. शिवाय "इनकमिंगना रेड कार्पेट" हा श्रेष्ठींचा वाढता कल निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. असे झाले तर क्षमतावान आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना अन्य पर्यायांचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. तसेच सोलापूर महापालिकेत शंभर प्लसचा निश्‍चय  करणे अपेक्षित आहे.  श्रेष्ठींच्या दाव्यानुसार महापालिका निवडणुकांसाठी युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow