पुण्यश्लोक आहिल्यादेवी हिंदू संस्कृतीचे मानबिंदू
संघ म्हणजे आधुनिक भारताच्या पुनरुत्थानाचे आंदोलन, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करून संघ शिक्षा वर्गाचा समारोप: रा.स्व.संघ पश्चिम क्षेत्र सहकार्यवाह यशवंतभाई चौधरी यांचे विचार

(विजयकुमार पिसे)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आधुनिक भारताच्या पुनरुत्थानाचे आंदोलन आहे. या आंदोलनात देशातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. संघाच्या शाखेतून देशभक्त तयार करण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे पश्चिम क्षेत्राचे सहकार्यवाह यशवंतभाई चौधरी (जळगाव) यांनी केले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी हिंदू संस्कृतीचे मानबिंदू व सांस्कृतिक एकता टिकवून ठेवण्याचे काम केले. आपल्या कार्यातून त्यांनी भारत जिवंत राष्ट्र असल्याचा संदेश जगाला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने तो संदेश अधिक मजबूत केल्याचे स्मरण चौधरी यांनी केले. हिंदू एकता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी वापर व नागरिक कर्तव्य याचा नागरिकांनी अंगीकार करावा असेही आवाहन त्यांनी आपल्या मनोगतामधून केले. ह.दे.प्रशालेत संघ शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
16 ते 31 मे दरम्यान रा.स्व संघाचा प.महाराष्ट्र प्रांत संघ शिक्षा वर्ग झाला. वर्ग समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ए.जी. पाटील कॉलेजचे सचिव सिद्धेश्वर पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर वर्ग सर्वाधिकारी अॅड.प्रशांत यादव, जिल्हा संघचालक सुनील इंगळे, शहर संघचालक राजेंद्र काटवे उपस्थित होते. संघ शिक्षा वर्गात शिक्षार्थ्यांंना देण्यात आलेल्या घोषवादन, पदविन्यास, दंड युद्ध, नियुद्ध, योगासन, पद्यगायन प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
वर्ग कार्यवाह अॅड.आनंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात संघ शिक्षा वर्गाची माहिती विषद केली. शहर सहकार्यवाह प्रवीण चिक्कळी यांनी आभार मानले. मुख्य शिक्षक अॅड. अक्षय खांडेकर, बौद्धिक प्रमुख बाबासाहेब गांगुर्डे व शरद शिंदे यांचेसह सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आ.देवेंद्र कोठे, सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत, नरेंद्र काळे, मनीष देशमुख तसेच नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिक व संघहितैशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






