दक्षिण सोलापूर मतदारसंघात 'अर्थपूर्ण' उमेदवारीची चर्चा
भाजपा प्रवेशाविनाच वैद्य यांची उमेदवारीची मागणी; त्या नगरसेवकांच्या भूमिकेविषयी आश्चर्य

सोलापूर: मूळचे तुळजापूर तालुक्यातील सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठीचा मागणी अर्ज पक्षाध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे , सादर केला असून त्यांना भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी पाठिंबा, दर्शविला आहे. वैद्य यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले की त्यांनी भाजपात प्रवेश केला याविषयी दक्षिण सोलापूर मतदार संघात उलट सुलट चर्चेस उधाण आले आहे.
भाजपच्या माजी सभागृह नेत्यासह सहा नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे. श्री. वैद्य हे पिंपरीचे आमदार महेश लांडगे यांचे पीए म्हणून कार्यरत आहेत. हा एवढा धागा पकडून त्यांनी भाजपाच्या उमेदवारीची दावेदारी केली आहे. तसेच त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव असून स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक आहेत. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका लावत जवळपास आतापर्यंत दीड कोटीहून अधिक खर्च केला आहे, असे समजते. ५१ हजार लाडू प्रसाद वाटप, लिंगायत समाज व धनगर समाजात कार्यक्रम, शिक्षकांच्या आंदोलनात झुणका भाकर, लाखो रुपयांच्या बक्षिसांची दहीहंडी, नेतेमंडळी यांचे वाढदिवस आणि महापुरुष यांची जयंती, पुण्यतिथी यानिमित्त वर्तमानपत्रांना पानभर जाहिराती तसेच सोमवारी मुस्लिम बांधवांच्या ईद मिलाद उन नबी निमित्त आसरा चौकात कार्यक्रम, , सर्वधर्मीय सर्वपक्षीय नेतेमंडळी यांच्याशी संपर्क व कार्यक्रमांना उपस्थिती यामुळे श्री. वैद्य यांना दक्षिण सोलापूरची अचूक नाडी समजली असे मानले जाते. त्यांच्या 'अर्थपूर्ण' उमेदवारीची चर्चा जोरात आहे.
श्री वैद्य कोणत्या पक्षाचे आहेत, याचा उलगडा काल झाला. जेव्हा त्यांनी भाजपाकडे उमेदवारी मागणीसाठी अध्यक्ष काळे यांच्याकडे अर्ज सादर केला.
यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, (राजश्री)अनिल चव्हाण, (वरलक्ष्मी) श्रीनिवास पुरुड, (राजश्री) अशोक बिराजदार आदी उपस्थित होते.
सोमनाथ वैद्य यांना भाजपने उमेदवारी द्यावी यासाठी भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी नगरसेविका वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड, राजश्री अनिल चव्हाण, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले, राजश्री अशोक पाटील - बिराजदार यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी अद्याप स्पष्टता नाही. मात्र विद्यमान आमदार देशमुख यांच्यासह अनेक इच्छुक यांनी तयारी केली आहे. वैद्य यांना भाजपाने उमेदवारी जर दिली नाही, तर ते लढणार नाहीत का? तसेच ज्यांनी पाठिंबा दिला तेव्हा ते वैद्य या़ंचेबरोबर की पक्षाबरोबर? त्यामुळे त्यांनी कोणत्या आधारावर पाठिंबा जाहीर केला. याविषयी मतदारसंघात चर्चा सुरू आहे.
What's Your Reaction?






