काडादींमुळे धर्म संकटात कोण?

किंवा नको ही ब्याद म्हणून दक्षिण सोलापूर ठाकरे सेनेला सोडला तर! शिंदे-राऊत यांची जाई जुईवर गुप्तगु काय सांगते?

Sep 18, 2024 - 07:03
 0  1026
काडादींमुळे धर्म संकटात कोण?

सोलापूर : निवडणूक लढण्यासाठी सतत नन्नाचा पाढा. कार्यकर्त्यांचा आग्रह आणि आता होकार; हा राजकीय नेत्यांचा सरधोपट मार्ग. सिद्धेश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी निवडणूक आखाड्यात उतरण्याच्या तयारीस लागले आहेत. दक्षिण सोलापूर (बहुदा) मधून लढण्याची तयारी दर्शवली आणि तडक टाकळी जाई जुई फार्मवर सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदे परिवाराच्या गणरायाला समर्थकांनी साकडे घातले. ते लढणार हे खरेच गृहीत धरले तर धर्म-संकटात कोण, कोण? हा कळीचा मुद्दा उपस्थित होत आहे.

    २००३ व २००४ मध्ये शिंदेंसाठी देवकते यांनी त्यांच्या मतदारसंघावर कायमचे पाणी सोडले. त्यानंतर (२००९ चा अपवाद वगळता दिलीप माने) दक्षिण सोलापूर काँग्रेसच्या हातून निसटला. या दरम्यान राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री यांच्यासह अनेकांना आहुती द्यावी लागली. आता काडादी यांचा दावा. काँग्रेसने संधी दिली, अन्यथा दुसरा पर्याय असा निर्धार असेल तर येथील भूमिपुत्रांचे काय?

 सिद्धेश्वर साखर कारखान्याला सत्ताधार्यांकडून त्रास दिला जातो म्हणून सूड उगवण्यासाठी भाजपावर राग, (जसे जरांगे पाटलांचे). म्हणून लोकसभा निवडणुकीत काडादी यांनी प्रथमच काँग्रेसचा प्रचार केला. प्रणितीताई निवडून आल्या, त्यामुळे काडादी यांना हुरूप आला असावा. वास्तविक दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रणितीताई यांना अपेक्षित मताधिक्क्य मिळाले नाही ही बाब नजरेआड करून चालणार नाही, (कारण; संघ परिवाराने स्वतंत्रपणे राबवलेली प्रचार यंत्रणा) तरी देखील आज अनेक इच्छुकांचा कल काँग्रेसकडेच आहे. वर नमूद उल्लेखित नेत्यांचा नैसर्गिक दावा आहे. त्यांना डावलून काडादी यांना उमेदवारी देणे, म्हणजे शिंदे धर्मसंकटात! कारण ताईंसाठी तुम्ही; तुमच्यासाठी आम्ही नाही, असे शिंदे यांना सुचित करावे लागेल. हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसचा होण्यासाठी प्रथमदर्शनी दिलीप माने यांचा दावा तुल्यबळ आहे. परंतु कोणीही चालेल, पण माने नकोत या भूमिकेतून काही नेते मंडळींनी यापूर्वीच काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे, अशात काडादी यांनीही हक्क सांगितला, तर ज्या कार्यक्षेत्रात सिद्धेश्वर कारखाना उभा आहे, त्या गावचे कुमठेकर दिलीप माने धर्मसंकटात येणार! मग काडादी यांच्या हाकेला धावून येणारे कुमठेकर यांचे काय? 

त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते गप्प बसतील? त्यांचा लढण्याचा कायमचा पिंड.

    देवकते, शिंदे, माने यांना संधी मिळाली. आम्ही काँग्रेससाठी आयुष्य वेचलो. परंतु आमदारकी नाहीच. अजून किती काळ प्रतीक्षा! धर्मसंकटात भूमीपुत्र आहेत.

  जाता जाता : काडादी समर्थकांच्या जाई जुईवर जोर बैठका सुरु झाल्या, तेव्हा तालुक्यात सोशल मीडियावर येणारे ट्रेंड धक्कादायक आहेत. येत्या दोन महिन्यात हाच ट्रेंड राहील की नाही हे आता सांगता येणार नाही. किंवा नको ही 'ब्याद' म्हणून दक्षिण सोलापूर ठाकरे सेनेला सोडला तर? (शिंदे आणि राऊत यांची जाई जुईवर गुप्तगु). मग हे धर्म-संकट कोणासाठी आणि संकट-मोचक कोण?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow