मनपासाठी चार सदस्यीय प्रभाग रचनाच, मुंबईत मात्र एक सदस्यीय वॉर्ड
सोलापूरसह 19 ड वर्गीय मनपा आयुक्तांना राज्य नगरविकास विभागाचा आदेश

(विजयकुमार पिसे)
तब्बल पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेल्या महापालिका निवडणुकांचे "रण" लवकरच पेटणार असून राज्याच्या नगरविकास विभागाने 19 ड वर्गीय महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे एक सदस्यीय की दोन की तीन सदस्यीय प्रभाग रचना यावर आता पडदा पडला आहे. सोलापूरला चार तर मुंबईत एक सदस्यीय प्रभाग रचना असेल हे नक्की.
राज्यात संभाजीनगरसह अन्य महापालिकांच्या निवडणुका पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित आहेत. तर सोलापूर, पुणे,पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक आदी मनपा निवडणुका अडीच वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचा आदेश मे मध्ये दिला. त्यानंतर निवडणूक़ आयोगाने राज्य शासनाकडे आठवड्यापूर्वीच प्रभाग रचना निश्चित करण्याविषयी विचारणा केली.
मंगळवारी सायंकाळी नगरविकास विभागाने मनपा आयुक्तांना याविषयी आदेश जारी केला असून सोलापूरसह अन्य 19 ड वर्गीय मनपात चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित करण्याविषयी कळविले आहे. यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, अकोला, कोल्हापूर, सांगली मिरज कुपवाड, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या मनपांचा समावेश आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, संभाजीनगर या महापालिका मोठ्या असून त्याविषयी प्रभाग रचनेबाबत स्वतंत्र आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. प्रभाग संख्या किती याची उत्सुकता असून सोलापूऱ मनपात लोकसंख्येनुसार गतवेळेपेक्षा अधिक़ सदस्य संख्या होणार, त्यामुळे प्रभागही वाढतील, असे दिसते.
दरम्यान आता भावी मेंबर इच्छुकांची मनपा कार्यालय परिसरात वर्दळ वाढल्याचे दिसून येईल. तर काहीजण पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरणार आहेत. पुढील काळ राजकीयदृष्ट्या गरमागरमीच राहणार आहे.
What's Your Reaction?






