सोलापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने भूवैकुंठी पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी यंदा राज्य शासनाचे महाआरोग्य शिबिर नाही. पालखी मार्गावर २१ भागांमध्ये अतिदक्षता विभागांसह ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने हा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षी आरोग्य मंत्रिपदावर असलेल्या तानाजी सावंत यांनी मोफत महाआरोग्य शिबिर राबवून १२ लाख वारकऱ्यांच्या सेवेचा विक्रम इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदवला होता, परंतु यंदा मंत्री बदलल्याने निर्णयातही बदल झाल्याचे दिसते.
आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूर शहर व परिसरात १५ लाखांपर्यंत वारकरी येतात. पायी येणाऱ्यांसह, वाहनांद्वारे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीचा मोठा ताण प्रशासकीय यंत्रणांसह, आरोग्य विभागावर येतो. मागील दोन वर्षे डॉ. सावंत यांनी 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' हे ब्रीद घेऊन महाआरोग्य शिबिर घेतले होते. यंदा आरोग्या खात्याचे मंत्री प्रकाश आबिटकर आहेत. त्यांनी गेल्याच आठवड्यात पंढरपूरला आढावा बैठक घेऊन तातडीच्या वैद्यकीय सेवेची यंत्रणा उभी करण्याची सूचना केली.
मागील अनुभवामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क मागील :
दोन्ही वेळच्या महाआरोग्य शिबिरांमध्ये १२ लाखांहून अधिक वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा मिळाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला होता. पण त्या शिबिरांबाबत माहिती अधिकार अर्जाची संख्या सर्वाधिक होती. शिबिराच्या निमित्ताने तज्ज्ञ डॉक्टरांसह, इतर कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. 'सेवा' या नावाखाली अनेकांनी मौन बाळगणे पसंत केले होते, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात होती.
पालखी मार्गावरच सुविधा रुग्णांना आरोग्य तपासणीसाठी ठराविक ठिकाणच्या शिबिरांमध्ये जाण्यासाठी गर्दीतून वाट काढावी लागते. त्यापेक्षा पालखी मार्गावरच तातडीच्या अत्यावश्यक सुविधा देण्यात येतील. त्यासाठी मागील वर्षीप्रमाणे तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी नियुक्ती केली.
डॉ. राजाराम पोवार, आरोग्य उपसंचालक, पुणे