बापरे..! 8 जण होरपळून ठार, आईच्या कुशीत बालकाचाही मृत्यू
कारखान्यास लागलेल्या आगीत दोन कुटुंबातील आठ सदस्य दगावले, 13 तासांनी आग आटोक्यात, 100 गाड्यांतून पाणी फवारणी

सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसीमध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन कुटुंबातील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. उस्मान मंसूरी यांच्या सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्याला पहाटे भीषण आग लागली होती. तब्बल 13 तासांनी आग आटोक्यात आली. 100 गाड्यांतून पाणी फवारणी करावी लागली.
या भीषण आगीत कारखान्याचे मालक उस्मान मन्सूर यांच्यासह कुटुंबातील चार तसेच कामगार मेहतान बागवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघे अशा एकूण आठ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अलीकडील काळात आगीची ही मोठी दुर्घटना आहे.
कारखान्याची आग अत्यंत भीषण होती. लाखो रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली. शिवाय अग्निशमन दलातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. ही आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या गावातूनही अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.
आईच्या कुशीत वर्षाचे बाळही दगावले
अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये पहाटे तीनच्या सुमारास कारखान्याच्या भीषण आगीत आईच्या कुशीत एक वर्षाच्या बाळालाही जीव गमवावा लागला. आगीपासून बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांताने मन्सुरी कुटुंबीय वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये गेले. पण तिथेही आग भड़कली. स्थानिकांनी धाव घेऊन मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र सगळेच प्रयत्न फोल ठरले. शेवटच्या क्षणापर्यंत सगळेच एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी आगीशी झुंजले. या आगीत उस्मानभाईचा नातू, मुलगा, सून अख्खे कुटुंबच दगावले. आपलं एक वर्षाचे बाळ वाचावं म्हणून आईने युसूफला आपल्या कुशीत घेतले होते. पण, आईच्या कुशीतच जीव सोडला. आई पण दगावली. बचावासाठी बेडरुममध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही आईच्या कुशीतलं बाळ पाहून गहिवरुन आलं होतं.
प्रारंभी पहाटे 5.30 च्या सुमारास आगीतून तीन कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानानी बाहेर काढले होते. त्यानंतर, कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय आतच अडकल्याचे कळताच जवानांनी तब्बल 14 तास शर्तीचे प्रयत्न केले. आगीतून मार्ग काढण्यासाठी भिंत फोडून बेडरुममध्ये धाव घेतली. मात्र, बेडरुममधून उस्मानभाईंसह कुटुंबीयांचे 5 मृतदेहच त्यांच्या हाती लागले. सुरुवातीला हे पाचही जण बेशुद्ध असावेत असा अंदाज काहींनी लावला होता. कुणाचातरी श्वास सुरू असेल म्हणून लागलीच रुग्णावाहितकेतून रुग्णालयात गाठलं. मात्र, आगीच्या दुर्घटनेत सगळ्यांनीच दम सोडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
या भीषण घटनेत आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मन्सूरी वय 87, अनस मन्सूरी वय 24, शीफा मन्सूरी वय 22, युसुफ मन्सूरी वय 1 वर्ष, आयेशा बागवान वय 38, मेहताब बागवान वय 51, हिना बागवान वय 35, सलमान बागवान वय 38 असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
What's Your Reaction?






