इटाळकरांना न्यायासाठी वडार बांधवांचा आक्रोश मोर्चा
बहिणीची छेड काढल्याबदल जाब विचारला, पण...आरोपींना फाशीची मागणी

धाराशिव : बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारण्यास गेलेल्या मारुती इटाळकर यांना काही समाजकंटकांनी हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेस महिला उलटूनही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याचा आरोप करत वडार समाजबांधवांच्या वतीने जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढला. मोर्चात हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले.
वडार समाजातील विद्यार्थिनी ८ मे रोजी रस्त्याने जात असताना धाराशिवमधील टवाळखोर गुंडांनी तिची छेड काढली. त्यामुळे तिचा भाऊ मारुती शिवाजी इटाळकर यांनी संबंधितांना जाब विचारला. त्याचा राग मनात धरत इटाळकर यांना अमानुष मारहाण केली. यात मारुती गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. वडार समाजाने मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात नेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. परंतु घटनेतील आरोपी सहा आहेत. त्यांना अटक करुन फाशी देण्याच्या मागणीसाठी वडार समाजाच्या वतीने इटाळकर यांच्या घरापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चा तुळजापूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मध्यवर्ती बसस्थानक मार्गे धडकला. यावेळी ठिय्या आंदोलन केले. मोर्चात जिल्ह्याला नांदेड, परभणी, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील समाजबांधवही सहभागी झाले.
इटाळकर कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा वडार समाजाच्या वतीने देण्यात आला. या मोर्चात पीडित इटाळकर कुटुंबीयांसह वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर, प्रदेशाध्यक्ष शिवाजी ननावरे, माणिक विटकर, बालाजी शिंगे, मी महाराष्ट्राचा वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, विकास पवार, राहुल जाधव, संदीप शिंगे, दत्ता विटकर, अंकुश दुर्लेकर, नितीन चौगुले, गुलाबराव देवकर आदींसह हजारो समाजबांधव सहभागी झाले.
मोर्चामुळे वाहतूक ठप्प
वाहनांच्या लांबच लांब रांगा वडार समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीवर काढलेल्या माेर्चात महिला, पुरुषांसह तरुणांची संख्या लक्षणीय होती. जिल्हा कचेरीसमोर दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या आहेत प्रमुख मागण्या: इटाळकर कुटुंबाला न्याय देण्यासाठी कुटुंबाचे सरकारने संपूर्ण पुनर्वसन करावे, कुटुंबातील मुलीच्या पुढील शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी सरकारने घ्यावी, कुटुंबाला २५ लाखांची तातडीची आर्थिक मदत करावी, कुटुंबाला राहायला हक्काचे सरकारी घर द्यावे, धाराशिव शहर पोलिस ठाण्याच्या संबंधित तपास हलगर्जीपणाने करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
What's Your Reaction?






