भाजपाचं "माधव" पॅटर्न सक्सेस

जरांगेच्या आंदोलनाचा ओबीसींना लाभ; वसंतराव भागवतांनी लावलेले रोपटे फुलले

Dec 21, 2024 - 11:23
 0  581
भाजपाचं "माधव" पॅटर्न सक्सेस

(लक्ष्यवेध : विजयकुमार पिसे)

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपानं बंपर यश मिळवलं. अपेक्षेपेक्षा अधिक जागांचे (132) दान मतदारांनी भाजपाच्या पारड्यात टाकून महायुतीवर विश्‍वास व्यक्त केला. या यशाचे इंगित आहे भाजपाचा "माधव" पॅटर्न! 

   गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाने घेतलेला वेग आणि मिळणारा प्रतिसाद. पाडा आणि गाडा हा नारा आणि त्याची धास्ती अनेक उमेदवारांनाही. त्यामुळे जो तो आंतरवाली सराटीचे दर्शन घेण्यात व्यग्र. आणि सर्वाधिक फटका भाजपालाच असाही तर्क, राजनीतीज्ञ आणि माध्यमांचाही होता. निवडणूक निकालाचे आकडे समोर आल्यानंतर इव्हीएमच्या वांग्यावर अजूनही राग आळवतायत. पाडा आणि गाडाच्या भरात यंदा तब्बल 78 ओबीसी आमदार निवडून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक भाजपाचे 43 आहेत. तर मराठा आमदारांची संख्या 118 वरून 104 वर आली आहे. भाजपाचं माधव पॅटर्न सक्सेस का झालं याचं कोडं अजूनही अनेकांना उलगडलेलं नाही. 

     भाजपा म्हणजे शेठजी आणि भटजीचा पक्ष अशी ओळख, असा नेहमीचा नॅरेटिव्ह. खर्‍या अर्थाने बहुजनांचा "ओबीसी" कैवार घेणारा पक्ष असे म्हणता येईल. तसे अनेक नेते आणि पक्ष स्वत:ला बहुजनांचा नेता(?) म्हणवून घेतात. आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्याचाही या कथित नेत्यांना राग देखील आहे. भाजपाने बहुजनांची ओळख 1980 मध्येच निर्माण केली. याचे कर्ते करविते आहेत, वसंतराव भागवत. 1980 च्या दशकात पक्षाचे संघटनमंत्री असलेले भागवत यांनी माधव पॅटर्न आणला. मा (माळी), ध (धनगर), व (वंजारी).

     2019 च्या निवडणुकीत 40 ओबीसी आमदार होते. यात भाजपाचे 24 होते. 2024 मध्ये 78 ओबीसी आमदारांमध्ये भाजपाचे 43, शिवसेना शिंदे गट 13 आणि राष्ट्रवादी अजीतदादा गट 9. ही महायुतीची संख्या आहे. तर काँग्रेस 4, शरद पवार गट 3 ठाकरे गट 3 आणि इतर 3 असे एकूण 78 ओबीसी आमदार आहेत. 2019 मध्ये 118 मराठा आमदार होते. आता ही संख्या 104 आहे. भाजपाचा ओबीसी टक्का यंदा विदर्भ आणि खान्देशात वाढला आहे.

  जरांगेंचे मराठा आरक्षण आंदोलन पेटले आणि लक्ष्य भाजपाच होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी "माधव" सूत्र लक्षात घेवून रोज ओबीसी समाजाच्या बैठकांचा जोर वाढवला. त्यानंतर महायुती सरकार म्हणून ओबीसी जातींसाठी महामंडळांची घोषणा केली. जवळपास 19 ओबीसी जाती केंद्रांच्या यादीत बसवल्या. असा सर्वंकश लाभ ओबीसी बहुजन घटकाला मिळाला. त्याचे फलित माधव पॅटर्नमध्ये आहे. आरक्षण आंदोलन, पाडा आणि गाडा ही घोषणा ओबीसी बहुजन समाजाने मनावर घेतली. आणि ओबीसींची रेष मोठी केली.

     माधव पॅटर्न म्हणजे नाशकाचे ना.स.फरांदे,(माळी) सांगलीचे अण्णा डांगे (धनगर) आणि बीडचे गोपीनाथराव मुंडे (वंजारी). हा माधव पॅटर्न रुजला आणि यशस्वीही झाला. 1995 मध्ये शिवसेनेेबराबरच्या युतीत महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपा सत्तेवर आला. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. डांगे ग्रामविकास मंत्री आणि प्रा. फरांदे सर विधान परिषदेचे सभापती.

   वसंतराव भागवतांच्या माधव पॅटर्नमध्ये गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे लाडके शिष्य होते. याशिवाय विश्‍वास गांगुर्डे, धरमचंद चोरडिया, प्रकाश जावडेकर, भाऊसाहेब फुंडकर, चिंतामण वणगा, अरुण अडसड, मधू पवार, माधव भांडारी, रमेश मेढेकर यांची टीम होती. ज्यांनी भागवतांवर विश्‍वास ठेवून महाराष्ट्रात सर्वदूर भाजपाला बहुजनांमध्ये स्थान मिळवून दिलेे. आज देखील मुख्यमंत्री फडणवीस भाजपा हा बहुजनांचा, ओबीसींचा पक्ष आहे, असे आवर्जून सांगतात. समोरची रेष लहान करण्यापेक्षा आपली रेष मोठी करणे हा संघ विचाराचा संदेश आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow