यामागे कुणाचा हात?
म्हणे मॅच फिक्सींग, तुतारीचा असाही शोध!

(विजयकुमार पिसे)
पराभवानंतर चिंतन सुरू होते. ही चिंता वेळ गेल्यानंतर करण्याऐवजी तेव्हाच काळजी घेतली असती तर....। जिंकलो तर माझ्यामुळे, आमच्यामुळे असा 'मी' 'मी' ध्वनित केला जातो. जिंकण्याचा 'बाप' एकच आणि पराभवासाठीची कारणे अनेक. त्याचे बाप 'अनेक'. सोलापूर जिल्ह्यातील पराभूत उमेदवार, त्यांचा पक्ष, गट, तट, समर्थक पराभवाचा शोध घेत आहेत. पराभवानंतर चिंतन सुरू होते. हे खरंय. तसं आवश्यकही. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात तुतारी समर्थक़ांची चिंतन बैठक़ पार पडली. तुतारीचे 'चाणक्य', पडद्याआडच्या सूत्रधारांचीही हजेरी. तेव्हा एक मुद्दा ठळक़पणे समोर आला. म्हणे *वरूनच दिल्ली मॅचफिक्सींग* झालं होतं. म्हणून अण्णा पडले. नव्हे तर ठरवून पाडले. त्यांचा निर्धारच आहे, अण्णांना आमदार नाही करायचं. बैठक़ीतील या चर्चेत मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं गेलं. साहेबांचं दिल्ली कनेक्शन। इथपर्यंत कोणाची पोच असू शकेल? कोठे म्हटले की यांचं नाव सर्वात पुढे येतं. यामागे कुणाचा *हात?*
अकलूजकरांची हॅटट्रिक
2009 मध्ये पंढरीत विजयदादांच्या नामुष्कीनंतर तब्बल 16 वर्षानी अकलूजकरांचा स्वाभिमान परत मिळाला. त्याचे कर्ते आणि नाकर्ते पवार साहेबच. हे ही तितकेच खरे. लोकसभेच्या यशानंतर अकलूजकरांनी माढा मतदारसंघावर आपली मांड अधिक पक्की केली. माळशिरस, माढा आणि करमाळा तीन ठिकाणी तुतारी फुंकली. यात बारामतीचे योगदान नाही बरं का. कारण निमगावकर शिंदे परिवाराने आत्मघात करून घेतला. तुतारी आणि घड्याळ घरापर्यत येऊनही शिंदेनी ते नाकारलं. वेळापूरचे जानकर जे कायम हाडवैरी त्यांच्याशी अकलूजकरांना जुळवून घेण्याचा 'उत्तम' इलाजच नव्हता. अभिजीत पाटलांची बिनचूक साखरपेरणी. आणि करमाळ्यातील हक्काचे नारायण पाटील पुन्हा एकदा आमदार झाले. यानिमित्ताने गेल्या दशकात साखर कारखाना निवडणुकीत रश्मी दिदींनी अकलूजकरांच्या पराभवाचे उट्टे निघाले. आणि शेजारच्या सांगोल्यात आबांच्या परिवाराचे कमबॅक झाले. यानिमित्ताने नेहमीच जड होणारे दीपकआबा आणि शहाजीबापूंचा परस्पर निकाल लागला. अकलुजकरांचे लक्ष्य संपूर्ण सोलापूर जिल्हा आहे. ही तडजोड खासदार ताई मान्य करतील? .
.शेकाप संपवाला निघाले, पण
ठाकरे परिवार आणि शेकाप यांच्यातही जुने हाडवैर असावे. त्यामुळे कोकणात अलिबाग भागात उध्दव ठाकरेंनी जंग जंग पछाडून त्यांना नाकी नव आणले. पवार साहेबांच्या पदराखाली शेकापचे अस्तित्व. विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांना सेनेच्या मतांचा कोटा दिलाच नाही. आणि जयंत पाटील जे पवारांची तुतारी घेवून संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यास सज्ज झाले होते.(संदर्भ : धैर्यशील मोहिते पाटील तुतारी घेण्यापूर्वी अकलूजमधील तो प्रसंग) त्यांना ठाकरेंनी चीत केले. हाच प्रयोग सांगोल्यातही होता. झाडी डोंगारला वाळवंट दाखवण्यासाठी दीपक आबांच्या हातात मशाल दिली. त्यात आबाच होरपळले, शिंदे सेनेचे शहाजीबापू पडले. पण जयंत भाईंच्या शेकापला संजीवनी मिळाली. शेकापला संपवायला निघालेल्या उध्दव ठाकरेंच्या *पण* (विडा)चा निकाल लागला. त्यांची फिफ्टी फिफ्टी झाली. दीपक आबा शहाजीबापूंसोबत असते तर....!
What's Your Reaction?






