मी पुन्हा आलो!

महाराष्ट्राचा जनादेश देवेंद्रच!!

Dec 4, 2024 - 12:11
 0  412
मी पुन्हा आलो!

(विजयकुमार पिसे)

मी पुन्हा येणार! म्हणजे येणारच!! जरा हटके!!! 14 कोटी महाराष्ट्रवासीयांचा जनादेश. यंदाची विधानसभा निवडणूक़ ऐतिहासिक ठरली. कारण पाच वर्षापूर्वीच्या जनादेशाच्या अपमानाचा व्हाईट वॉश मतदारांनीच केला. त्यामुळे देवेंद्र का? या प्रश्‍नाचे उक़लही झाले. आज बुधवारी भाजपा विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीवर केंद्रीय निरीक्षक विजय रूपानी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोहोर उमटविली. गुरुवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईत आझाद मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हजारो जनतेच्या साक्षीने देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस यांची ही हॅट्ट्रिक आहे. याचा आनंद फडणवीस यांना जितका आहे, तितकी त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना *लक्ष्यवेध न्यूज पोर्टल परिवारातर्फे शुभेच्छा!* आणि महाराष्ट्राचे मनोनित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे *अभिनंदन!!*

  विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. मतदारांनी महाविकास आघाडीचा (फक्त 46 जागा) सुफडा साफ करून महायुतीला (237 जागा) भरभक्कम बहुमत दिले. या यशाचे शिल्पकार अर्थातच देवेंद्र फडणवीस. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी कधी होणार याची उत्सुकता वाढली. पण कधी कधी यशाला नजर लागते. गेले 11 दिवस अडथळ्याची शर्यत सुरू होती. त्यामुळे संशयाचे काहूर उठले होते. दक्षिण भारतात 'फेंगल' चक्रीवादळामुळे 'नभ मेघांनी आक्रमिले' तसे राजकीय ढग महाराष्ट्राच्या सत्ताकारणात निर्माण झाले. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा मोह सोडवेना. शीर्षस्थ नेत्यांचेही संकेत मिळेना. कमालीच्या विलंबामुळे (लक्ष्यवेधची न्यूज : 30 नोव्हेंबर) *देवेंद्रच का?* असा सवाल उपस्थित करावा लागला. म्हणतात ना, देर आये दुरस्त आये। राजसत्तेचे मळभ हटले आणि मी पुन्हा आलो, याचे दमदार उत्तरही मिळाले.

  मी पुन्हा येणार, असे फडणवीस 2019 मध्ये म्हणाले. त्यांची खिल्ली उडविली गेली. फडणवीस पुन्हा येणार हे सत्यच होते. पण या सत्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न झाला. मध्ये 72 तासांचे मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर अडीच वर्षानी या सत्याला चोख उत्तरही मिळाले. नव्हे तर त्यांचेच (ठाकरे) सहकारी (शिंदे) यांनी घरी पाठविले आणि आता त्यांची अवस्था (काँग्रेस16, राष्ट्रवादी शा.प.गट 10 आणि उबाठा20. एकूण46 व तब्बल 52 जागा गमावल्यात)) 2019 पेक्षाही इतकी वाईट झाली, की मतदारांनीच त्यांना यंदा घरी बसवले. 

   14 कोटी जनतेच्या आशीर्वादाने देवेंद्र पुन्हा आले आहेत. याचा निश्‍चितच आनंद आहे. तितकीच त्यांची जबाबदारी वाढली आहे. सर्वांचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक करणार आहेत. त्यांची वाटचाल ही महाराष्ट्रवासीयांची अपेक्षापूर्ती करण्याची आहे. गटनेता निवडीनंतर आज फडणवीस मनोगत व्यक्त करताना म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्वागीण उन्नतीसाठी 24 तास काम करावे लागणार आहे. तसा निर्धार केला आहे. त्यांच्या निर्धार आणि निश्‍चयातून देशात, महाराष्ट्र पुन्हा अग्रेसर होईल. त्यासाठी कप्तान फडणवीस आणि त्यांचे सहकारी एकनाथजी शिंदे, अजीतदादा पवार आणि या त्रिमूर्तीच्या समस्त टीमला पुनश्‍च शुभेच्छा देऊयात . 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow