सिल्व्हर ओक ते सागर! व्हाया वर्षा!!
महाराष्ट्राचं नवं पिक्चर.....

(विजयकुमार पिसे)
लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट 80 टक्के. तुतारी वाजवली आणि 10 पैकी चक्क आठ खासदार साहेबांचे. इतका बोलंबाल की, विधानसभेसाठी त्यांनी सरळ सांगूनच टाकलं, आघाडीत सीएमचा चेहरा नाही. तेव्हापासून मातोश्रीवरला चेहरा खालीच पडला राव. बारामतीकरांच्या मनात नेमकं काय? याचा मागमूस नसतोच. ताई, जयवंतराव सीएमसाठीचे प्रोजेक्टेट चेहरे. आता कदाचित उध्दवजी मनातून जाम खूष असतील. चेहरा नसला तरी, आघाडीत आमचाच (20 जागा) मोठ्ठा भावं. या निवडणुकीत तिकीट वाटपापूर्वी रोज एकापेक्षा अधिक, हाताची बोटं देखील कमी पडतील. सगळ्यांच्याच रांगा सिल्व्हर ओकवर. माध्यमांना तर लईच भारी कौतुक. किती सांगू आणि लिहू असं झालं होतं. लाईव्ह, 24 तास, डोळे उघडा...आणि ...नीट. आता सारं "साम" सूम.
"लोकशाही" आहे ही! संविधान फक्त यांच्या (परिवार कल्याण) साठीच आहे? साहेबांना फुरसतच नव्हती. एका गावात पक्ष प्रवेशाचे भव्य सोहळे. तिथे पुढल्या गावाची सुपारी द्यायला नेत्यांची हजेरी. मग पुढचा पाडाव. अमुक सरदारच्या गावात तुतारी. असं वाटायं की, महायुतीकडले "खोके" पार रिकामी होतील की काय? पक्षाचं तिकीट देतो म्हणलं तरी नगं नगं. आम्ही आपलं तुतारीच बरं. निमगावकर तेव्हा बहुदा म्हणाले असावेत, बारामती तुमास्नीच लखलाभ. शिंदे परिवारानं ना तुतारी घेतली, ना घड्याळ. त्यांच्या धरसोडीमुळे माढा, करमाळाही गेलं. अनेक नेत्यांचा साहेबांविषयी इतका ठाम विश्वास यंदा महाराष्ट्राच्या निवडणुकीत दिसला. पुढे पुढे तर दिलेल्या तिकिटाची ऐनवेळी कापाकापी. मोहोळ आणि दक्षिण सोलापुरात असंच झालं. इकडचे साखर सम्राट दोन्ही घरचे उपाशी राहिले. ना सुशीलकुमारांचा आशीर्वाद फळला, ना ताईंच्या शुभेच्छा. ना साहेबांची कुटनिती. असो.
"सिल्व्हर ओक" वर गर्दीचा महापूर. निवडणूक संपली. निक्कालही लागला. जो तो सांगतोय. साहेब अजून संपले नाहीत बरं. खरंय ते. निकालानंतर संन्यास घेणार ही जुनी घोषणा. त्या दिवशी मोठ मोठे हेडलाईन्स. टेबलवर न्यूज्स. मराठी चॅनलवर भरगच्च सुसंवाद, आणि 24 तासात यू टर्न! साहेबांच्या या नेहमीच्याच यू टर्नला कंटाळून दादा एक़दाचे बाहेर पडले. दादांनाही पटलंय. "गोविंदबाग" सोडून "रेशीमबाग" परिवारासोबत गेलो म्हणून चाळीशी (41 जागा) पार झाली. मला नागपूरचीच हवा बरी. असो.
सिल्व्हर ओक वरची गर्दी ओसरली असावी(?) कारण चॅनलवर आणि पेपरमध्ये आणि सोशल मिडियावर दिसत नाही. की दाखवलं जात नाही. कालाय तस्मै नम:! निवडणूक निकालानंतर कळून चुकलं, महाराष्ट्राचा हिरा कोण! आणि कोण सुपर पॉवर स्टार हिरो!! अनं नवं पिक्चर म्हणजे सिल्व्हर ओक ते सागर, व्हाया वर्षा. माहोल बदललाय. तिकडं ओकं बोकं. आणि इकडं भेटीचा सिलसिला. शुभेच्छांचा, सदिच्छांचा महा"सागर"! निवडून आलेला आमदार, पडलेला उमेदवार, यामध्ये तुतारीवालेही बरेच. सिल्व्हर ओकवर पायधूळ झाडलेलेही, तिकीट न मिळालेले, तिकीट देऊन नंतर कापलेले. सीएमच्या निवासाकडे फिरकले नाहीत, असं उगीच वाटू नये म्हणून काहीजणांनी "वर्षा"वरही मारली फेरी. अर्थात सिल्व्हर ओक ते सागर. व्हाया वर्षा. असा नवा पिक्चर काढायला हरकत नसावी. राजकारणाचे आणि सत्ताकारणाचे बदलेले रंग आहेत हे. देवाभाऊंचा चमत्कार! कुणी सांगावं. तेव्हा ही गर्दी मातोश्री, मराठवाड्यातील पाटलांच्या "त्या" गावाकडेच होती. आणि सारं वातावरण असं होतं की फक्त एकच आदेश "पाडा" आणि "गाडा". सूज्ञ मतदारांनी कुणाला पाडलं आणि गाडलं. हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. कारण हा सांगावा धाडणारं केंद्र होतं सि.ओ! आत्ताशी फक्त सागर!! आणि 5 डिसेंबर नंतर बहुदा मुक्काम पोस्ट फक्त वर्षा!!
.................
(सूज्ञांसाठी : सिल्वर ओक बंगला, सागर बंगला, आणि वर्षा निवास स्थान)
What's Your Reaction?






