डिसेंबरमध्ये गृह संवाद अभियान, हिंदू संमेलने, पंच परिवर्तन बिंदूूवर लक्ष केंद्रित

जागतिक शांतीसाठी हिंदू प्रारूप विकसित करणार : शरदराव ढोले, येत्या 25 वर्षासाठी संघाचे नियोजन: पुण्यात रा.स्व.संघ शताब्दी वर्ष प्रांतिक बैठक

Jul 20, 2025 - 20:33
 0  262
डिसेंबरमध्ये गृह संवाद अभियान, हिंदू संमेलने, पंच परिवर्तन बिंदूूवर  लक्ष केंद्रित
रा.स्व.संघ प्रांत समन्वय बैठक उद्घाटनप्रसंगी (डावीकडून) शरदराव ढोले, प्रांत संघचालक नाना जाधव, क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी आणि प्रांतकार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव.

(विजयकुमार पिसे)

पुणे : जगाला जर शांतता हवी असेल, तर हिंदू जीवनविचारांच्या आधारावरच पुढे जावे लागेल. याचे प्रारूप येत्या पंचवीस वर्षांत संघ विकसित करेल, अशी माहिती रा.स्व. संघाचे अ.भा.धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले यांनी दिली. रविवारी पुण्यात प.महाराष्ट्र प्रांत समन्वय बैठक पार पडली. संघ शताब्दी वर्षात डिसेंबरमध्ये गृह संवाद अभियान, हिंदू संमेलने, पंच परिवर्तन बिंदूवर लक्ष केंद्रित करणार आहे. या दृष्टीने बैठकीत नियोजनावर चर्चा झाली.

     फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडलेल्या समन्वय बैठकीला पश्‍चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव, अ.भा.कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थित होते.

     या बैठकीत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांचे प्रांतभरातील संघ प्रेरित 49 संघटनांचे 328 कार्यकर्ते व मातृशक्ती सहभागी होते. शताब्दी वर्षाचे महत्त्व अधोरेखित करताना शरदराव ढोले म्हणाले की, वैश्‍विक पटलावर भारताला विकसित आणि मार्गदर्शक बनायचे असेल, तर हिंदू मूल्याधिष्ठित समाज निर्माण करावा लागेल. त्याची सुरुवात म्हणजे संघ शताब्दी आहे. समाजातील सज्जनशक्ती आणि लाखो स्वयंसेवक पंच परिवर्तन जीवनात उतरवतील, तेंव्हा त्यातून संपूर्ण देशात समाज परिवर्तनाची सुरवात होईल, असा विश्‍वासही ढोले यांनी व्यक्त केला. 

*येत्या विजयादशमीपासून शताब्दी वर्ष पर्व*

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रमांची सुरुवात विजयादशमी (2 ऑक्टोबर 2025) पासून होत आहे. त्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतातही मंडल आणि नगर स्तरावर शस्त्रपूजन उत्सव होतील. यावेळी सर्वाधिक संख्येने गणवेशधारी स्वयंसेवक असतील असे प्रयत्न आहेत. डिसेंबर महिन्यात घरोघरी जाऊन संघ समजावून सांगण्याचे काम गृह संवाद अभियानातून होईल. तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात प्रांतभर हिंदू संमेलने आयोजित केले जातील. समाजाच्या सहभागातून, कुटुंब प्रबोधन, समरसतापूर्ण व्यवहार, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरिक शिष्टाचार आणि 'स्व'-बोध या पंच परिवर्तन बिंदूंवर कार्य केले जाणार आहे,अशी माहिती प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow