दे टाळी, दे हाळी!
दे टाळी, दे हाळी!

(विजयकुमार पिसे)
मधूनच कुणी तरी दे टाळी म्हणतो आणि सुस्कारा सोडतो. ठाकरे बंधू एकत्र येणार....! शनिवारी दिवसभर च्यायनलवाल्यांनी रौतांच्या दे टाळीच्या इतक्या स्टोर्या चालवल्या की शेवटी दर्शकांनी हातातला रिमोट चालवला. किळस आला त्या टाळीचा. ठाकरे घराण्यात उध्दव आणि राज हे दोन ध्रुव. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न स्व.बाळासाहेबांसह अनेकांनी केला. त्यांच्या मृत्यूनंतर दे टाळीची आशा बळावली होती. पण मातोश्रीमधून पुन्हा धूर निघाला. आता म्हणे मराठी मुद्द्यावर आपण टाळी देऊ. पण टाळी देणारे राज ठाकरे आणि मनसे यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न झाला, हे कुणी विसरेल? हा पाढा मनसेचे संदीप देशपांडेंनी वाचला आहे. मराठी आणि मराठी केवळ जप करून राजकारणाची वरची पायरी गाठणे शक्य आहे? या दरम्यान उध्दवसाहेबांनी किती अमराठींना संधी दिली ही यादी देखील मोठी आहे. म्हणून तर आदित्यबाबांना निवडून येण्यासाठी मराठी मुलखात केम छो... चा नारा दिला गेला. आम्ही आमच्या मुलाचं बघतो. पण तुमच्या मुलाचा वाईट्टच झालं पाहिजे ही प्रतिज्ञा पूर्णत्वास नेली. अन्यथा राजसाहेबांचे पुत्र अमित देखील आज आमदार म्हणून विधासभेत दिसले असते. अशा स्थितीत दे टाळीचा आवाज दिला तरी त्या टाळीवर विश्वास कोण ठेवणार! "दे टाळी ची व्याख्या दे हाळी" अशी झाली आहे. त्यामुळे अशा किती जरी टाळ्या रौतांनी वाजवल्या तरी ती एका हातानेच! अर्थात... त्या टाळीला आहे अर्थ?
What's Your Reaction?






