एपीएमसीवर आ.कल्याणशेट्टी, माने पॅनलची सरशी

हसापुरेंची 10 वर्षानंतर एन्ट्री, ग्रा.पं.मध्ये ओन्ली बापू हेच खरे ठरले, नेतृत्व भाजपाचे पण मिळाली फक्त दक्षिणा, गतवेळी संचालक काँग्रेसी, सभापती भाजपाचा, आता सभापती होणार कोण? व्यापारी गट, ग्रा.पं.त लिंगायत फॅक्टर, क्रॉस व्होटींगचा शहांना फटका, नेते जिंकले अन् कार्यकर्ते....

Apr 28, 2025 - 18:04
 0  653
एपीएमसीवर आ.कल्याणशेट्टी, माने पॅनलची सरशी

 (विजयकुमार पिसे)

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आ. सचिन कल्याणशेट्टी आणि दिलीप माने यांच्या पॅनलची सरशी झाली, ग्रामपंचायत गटात आ.सुभाषबापूंची ताकद दिसली. लिंगायत फॅक्टरचा प्रभाव व्यापारी आणि ग्रा.पं.दुर्बल घटक मतदारसंघातून समोर आला आहे. याचा फटका यतीन शहा (537) यांना बसला. तसेच व्यापारी गटात अमोल बिराजदार आणि रमणशेट्टी यांना व्यापार्‍यांची निर्णायक मते मिळाली, ती एकत्रित झाली असती तर? प्रणिती शिंदे समर्थक सुरेश हसापुरे यांची दहा वर्षानंतर एन्ट्री झाली असून त्यामुळे आता सभापती कोण याची उत्सुकता राहील किंवा कदाचित फासा पलटेल. या निकालाने दोन गोष्टी अधोरेखित झाल्यात, 1)नेतृत्व भाजपाचे असले तरी हातात मिळाली फक्त दक्षिणा. आणि 2)नेते जिंकले अन् कार्यकर्ते? निवडणुकीचे नेतृत्व भाजपाचे पण फायदा काँग्रेसचा अशी ही निवडणूक भाजपाईंना अस्वस्थ करणारी ठरली. हे सत्य नाकारून चालणार नाही.

   सोसायटी गटात काँग्रेेसची ताकद निर्विवाद आहे. या ठिक़ाणी दिलीप माने (1362), राजशेखर शिवदारे (1366), सुरेश हसापुरे (1352), श्रीशैल नरोळे (1244), उदय पाटील (1276), प्रथमेश पाटील (1268), नागण्णा बनसोडे (1276), अविनाश मार्तंडे (1345) इंदुमती अलगोंडा (1345), अनिता विभुते (1300) आणि सुनील कळके (570), चांदा गफार (373) हे विजयी झाले. आ.सुभाष देशमुख गटाचे ग्रामपंचायत खुल्या गटातून मनीष देशमुख (636), रामप्पा चिवडशेट्टी (615) आणि मागास गटातून अतुल गायकवाड (589) यांना कौल मिळाला. व्यापारी गटात वैभव बरबडे (661) आणि मुश्ताक चौधरी (623) हे विजयी झाले. पराभूत अमोल बिराजदार 545 आणि रमणशेट्टी 228 मते मिळाली.

   *बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तसे चार आमदार भाजपाचे आहेत. सहकार क्षेत्रात भाजपाचे प्राबल्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाने शेतकर्‍यांसाठी बाजार समिती आहे म्हणून शेतकरी मतदानातूनच संचालक निवडायची भूमिका का घेतली नाही. तसा कायदा का बदलला (फडणवीस यांनी आणला) नाही. परिणामी म्हणायला आम्ही मोठे भाऊ, लाभार्थी मात्र काँग्रेसी. शिवाय कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक़ असेल तर किती कार्यकर्ते निवडून आले आणि नि आणले. याचे चिंतन भाजपाई नेत्यांनी करणे आवश्यक आहे. अन्यथा सत्तेसाठी (लाभासाठी) नेते आणि केवळ कामासाठी कार्यकर्ते.

चाणाक्ष काँग्रेसीनी भाजपा आमदारांना अधिकार दिले, आणि अपेक्षेप्रमाणे त्यांचे नेहमीचे सोयीचे चेहरे निवडून आणले. या निवडणुकीत दोन दादांचा (कल्याणशेट्टी/कोठे) आणि दोन (सुभाषबापू/विजयकुमार) देशमुखांचा दोस्ताना पाहायला मिळाला. हा दोस्ताना सलामत राहो. त्याचबरोबर त्यांचा दोस्ताना पक्षवाढीसाठी (सहकार क्षेत्रात) लाभदायी ठरो, एवढीच किमान अपेक्षा. अन्यथा.*  

   *फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यश : आ.कोठे

   निवडून आलेले पॅनल फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. पॅनल शतप्रतिशत भाजपाचे आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणेच आम्ही लक्ष घातले. त्यामुळे हे पॅनल आपल्यासोबत राहील. आपण काँग्रेसला जोडून घेतले आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला अनेक काँग्रेसजणांनी साथ दिली. त्यामुळे सगळे आपलेच आहेत, असे आ.देवेंद्र कोठे यांनी निवडणूक निकालावर भाष्य केले.

*अपक्ष मळेवाडी 55 मते..*

 *बटोगे तो.. फॅक्टर*

   ग्रा.पं. आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात भाजपाचे उमेश सुरेश मळेवाडी यांनी अपक्ष म्हणून एकाकी झुंज दिली. त्यांना 55 मते मिळाली. यामुळे भंडारकवठेचे यतीन शहा यांना फटका बसला. येथेही लिंगायत फॅक्टर प्रभाव होता. मुस्तीचे कळके सावकार यांना 570 मते मिळाली. खर्‍या अर्थाने आर्थिक दुर्बल घटक असेच उमेदवार दोन्ही पॅनलने दिले होते का? व्यापारी गटातही लिंगायत फॅक्टर प्रभावी होता, पण नीट योजना झाली नाही, अन्यथा बटले गेले, म्हणून बिराजदार कटले गेले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow