परिवर्तन विकास आघाडीतच "बटोगे"

वैद्य, राठोड, सोनटक्के, तौफीक शेख एकला चलो रे!

Nov 9, 2024 - 20:14
 0  261
परिवर्तन विकास आघाडीतच "बटोगे"

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीची वज्रमूठ किती ठिसूळ होती, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. बटोगे तो कटोगे हा नेहमीचा शिरस्ता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आणि माघारच्या शेवटापर्यंत "हम एक है, नेक है", असाच नारा आणि निर्धार. ४ नोव्हेंबरला माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर "एक" आणि "नेक" असलेल्या सगळ्यांमध्येच "बेदिली" झाली. आणि जो तो अपक्ष हाच अजेंडा घेवून रणांगणात उभे आहेत. 

  तुळजापूर तालुक्यातील मूळचे रहिवासी सोमनाथ वैद्य, डॉ. युवराज राठोड, सचिन सोटक्के आणि तौफीक शेख यांची एक़ला चलो रे ची भूमिका आहे. 

लोकसभा निवडणूक़ झाल्यानंतर पाच महिन्यापूर्वी दक्षिण सोलापुरातील प्रस्थापितांना मात देण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीची स्थापना झाली. यामध्ये जवळपास 15 इच्छुक उमेदवार होते. कार्यक्रम, बैठक़ा, उपक्रम, दौरे, बक्षिसांची खैरात अगदी मु क्तपणे. यापैकी एक़ा उमेदवाराने सांगितले की, मी आतापर्यत दीड कोटी खर्चलेत, आणखी साडेतीन कोटी खर्चणार आहे. आणि पक्षाचे तिकीटही मिळवणारच असा दावाही केला होता. अन्य पक्षांचे पदाधिकारी यांच्या पाठिेंब्याची पत्रेही मिळवली. पण यापैक़ी एकही नेता व पदाधिकारी आता सोबतीला राहिलेला नाही. हे उमेदवार महोदय कोण हेे ओळखायला हरकत नाही. पण त्यांना मतदारसंघाची नाडी नीट व अचूक ओळखता आली नाही, हेच खरे. मग ते वैद्य कसे?

दक्षिण सोलापूरच्या भीमा,सीनेचं पाणी अजून कोणी जोखले नसावे. स्व.देवकते यांनाच ते जमले. पण गत पाच सहा महिने तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचा नुसताच धुराळा उडत होता. पैशाचा तर पूर वाहात होता. मिडियात अनेकांना रोज लक्ष्मीदर्शन होते म्हणे. म्हणून त्या पैकी अनेकांनी जोरात हवा दिली, आणि पार एकदम त्यांना टॉपवर पोहोचवले. मतदारांची व कार्यकर्त्यांचीही चांगलीच चंगळ. असो....या पंधरापैकी किती जण अर्ज भरले आणि किती माघारले. आणि आणाभाका घेतलेल्यांपैकी किती उमेदवार या एकला चलो रे उमेदवारांसोबत आहेत. परिवर्तन विकास आघाडीचा नारा होता, मतदारसंघात परिवर्तन ़घडवू, विकासाची गंगा आणू. परिवर्तन नव्हे तर नेते व उमेदवारांचेच वर्तन "यू टर्न" झाले आहे. त्यामुळे रिंगणात राहिलेल्या, टॉपवर गेलेल्या उमेदवारांना एकाकी खिंड लढवावी लागत आहे. आता ना आगा, ना पिछा. 

  प्राप्त माहितीनुसार सोमनाथ वैद्य, डॉ. युवराज राठोड, सचिन सोटक्के आणि तौफीक शेख रिंगणात आहेत. याशिवाय संतोष पवार, महादेव कोगनुरे, अप्पाराव कोरे, बसवराज बगले,बाळासाहेब पाटील हे देखील लढतीत आहेत. पण परिवर्तन आघाडीचा खरा अजेंडा/चेेहरा भाजपाला विरोध असाच होता. दिलीप माने यांना बव्हंशी छुपा पाठिेबा होता. दिलीप माने यांची तलवारच शिंदे परिवाराने म्यान केली, त्यामुळे परिवर्तनवाल्यांचा मध्येच दम तुटला. काडादी अचानक आल्यामुळे परिवर्तनलाही झटकाचा बसला. अन्यथा....

माजी उपमहापौर राजेश काळे, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णाप्पा सत्तुबर, म.बसवेश्‍वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे, सचिन चव्हाण, अप्पासाहेब पाटील, मळसिध्द मुगळे आदींनी माघार घेत परिवर्तन विकास आघाडीला बाय बाय केले आहे. मीनाक्षी टेळे, ख्याडे यांंनीही माघार घेतली. मेनका राठोड यांचा अर्ज छाननीत बाद झाला. मधूनच दम तुटलेल्या नेत्यांमुळे अपक्ष उमेदवारांची प्रचारात दमछाक होत आहे. त्यांच्या प्रचाराच्या बातम्याही जोरात चालवल्या जात आहेत. नाविलाजच त्यांचा. *"बटोगे"ची बीजे प्रारंभीच पेरली गेलीत, त्यामुळे ती उगवणेपूर्वीच *"कटोगे" ना!*

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow