पद्मशाली समाजात मोठी पोकळी!
महेश कोठे यांचे आश्वासक नेतृत्व

संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून किती मोठा जनसंपर्क असतो, हे स्व. महेश कोठे यांच्या निधनानंतर पार्थिवाचे दर्शन आणि अंत्ययात्रेस झालेली शोकाकुल हितचिंतकांची गर्दी पाहिल्यानंतर लक्षात येते. एका नेत्याच्या नावाने सुरू केलेले संपर्क, त्याचे प्रमुख तात्या कोठे, त्यांचे समाजकारण आणि त्यानंतर त्यांचे पुत्र महेश कोठे यांचे राजकारण यांच्या अनेक आठवणी आहेत. सोलापूरला चेहरा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची दखल घेतली जाईल. 30 व्या वर्षी सोलापूरचे सर्वात तरुण महापौरपद लाभलेेले महेश कोठे यांचे मकर संक्रांतीच्या पुण्य पर्व काळात प्रयागराज येथे महाकुंभात गंगास्नानानंतर ह्द्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सोलापूरकरांच्या मनाला चटका लावणारी ही दु:खद घटना. कोठे यांच्या निधनाने एक पर्व संपले.
स्व. कोठे यांनी हैदराबाद रोडवरील विडी घरकुलची वेगळी ओळख करून दिली. या भागातील रहिवासी कोठे यांना घरकुलचे विकासपुरुष म्हणत. याची प्रचिती येथील अंत्यदर्शन प्रसंगी लोटलेली गर्दी हीच साक्ष आहे. 1992 पासून 2022 पर्ंयत कोठे महापालिकेत घरकुल भागाचे प्रतिनिधित्व करीत होते. नगरसेवक, महापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता या जबाबदार्या पार पाडताना महापालिकेचा सर्वांगीण अभ्यास असलेला नेता महेश कोठे यांनी केवळ विडी घरकुलच नव्हे तर सार्या शहरात त्यांची विकासाची दृष्टी होती. आणि हे करताना त्यांनी लोकसहभाग आवर्जून ठेवला. महेश कोठे यांचे पुतणे आ. देवेंद्र कोठे आपल्या काकाची आठवण सांगताना म्हणाले, लोकसहभागाशिवाय विकास अपूर्ण. या भूमिकेतूनच महापालिकेचे प्रशासन, नगरसेवक व पदाधिकारी व नागरिक यांची सांगड घातली. आणि आपला दबदबा कायम ठेवला. महेशअण्णा कोठे काँगेसचे असले तरी त्यांच्याकडे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचा वावर मोठा होता. आपल्या वॉॅर्डात विकास करायचा असेल आणि त्याच्या कार्यवाहीत गुंतागुंत असेल तर त्यावरचे सोल्युशन म्हणजे महेशअण्णा.
महापालिकेत सत्तेवर अथवा पदावर आणि कुणीही अधिकारी असला तरी कोठे यांच्याशिवाय पानही हलत नसे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोठे कशी आर्थिक तरतूद करायची आणि ही तरतूद विकास कामासाठी किंवा घरकुलसाठी कशी वळवायची हे भल्या भल्यांनाही कळत नसे. असा जाणकार अभ्यासू लोकप्रतिनिधीची उणीव महापालिकेत दिसेल.
स्व. महेश कोठे यांच्या जाण्याने अशाच प्रकारची पोकळी पद्मशाली समाजातही राहील. बेत, कुचन, दिकोंडा, सादूल या दिग्गज लोकप्रतिनिधींचा काळ वैभवशाली होता. वस्त्रोद्योगातील मंदी, सहकारातील स्वाहाकारने झालेली पिछेहाट पाहता तात्या कोठे यांनी अशाही स्थितीत पद्मशाली समाजाचे नेतृत्व अबाधित ठेवले. पूर्व भागात कोठे परिवाराचा दबदबा कायम ठेवला. मूलभूत विकास, सोयी सुविधा यांच्या बरोबरीने शिक्षण, आरोग्य, सुरक्षा यांचीही व्वयस्था उभी केली. सार्वजनिक दवाखाने उघडले. घरकुलसाठी स्वतंत्र पोलीस चौकीसाठी पुढाकार, कष्टकरी तेलुगू भाषकांसाठी शैक्षणिक संस्था काढल्या. पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोठे कार्यरत होते. ज्ञाती संस्थेच्या माध्यमातून समाजव्यवस्था मजबूत केली. अनेक धाडसी निर्णय घेतले. युवक संघटनेला बळ दिले. दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळे यशस्वीतेने पार पडण्यासाठी कोठे यांचा मोठा हात राहिला. पूर्व भागातील आणि घरकुल परिसरातील गणेशोत्सव, मार्कंडेय रथोत्सव, मार्कंडेय जयंतीच्या यशस्वीतेसाठी कोठे यांचा पुढाकार होता. या माध्यमातून युवा नेतृत्वही त्यांनी घडवले. संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूरचा पद्मशाली समाज संपन्न ही ओळख करून दिली. पद्मशाली समाजाला कोठे एक आश्वासक नेतृत्व होते. विशेषत: युवा वर्ग कोठे यांच्या बाजूने होता. त्यांच्यासाठी ही मोठी पोकळी आहे. तात्या आणि अण्णा यांचा सामाजिक व राजकीय वारसा भाजपाचे आमदार देवेंद्रदादा समर्थपणे पेलतील, हे त्यांच्या कार्यशैलीतूनच प्रतिबिंबित होईल.
राजकारण म्हणून कोठे यांची सुरवात काँग्रेसमधून झाली. पण ज्या पक्षात महेश कोठे होते, त्या ठिकाणी आपला दबदबा कायम ठेवला. सूत्रे माझ्या हाती द्या, मी करून दाखवतो हा आत्मविश्वास त्यांनी कृतीने सिध्द करून दाखवला. पण त्या पक्षांनी आपली सोय करून घेतली, जेव्हा देण्याची वेळ आली तेव्हा नेत्यांनी हात आखडता घेतला. इथेच राजकीय लढाईने त्यांचे मनोबल कमी केले. चार विधानसभा निवडणुकांत हातातोंडाशी आलेला घास कसा हिरावून नेला. ही हुरहूर त्यांच्या जाण्याने कायमची राहणार आहे.
............
What's Your Reaction?






