पवारांची तुतारी, फडणवीसांची घेतली सुपारी
साखर सम्राट भाजपा विरोधातील मोहरे, काडादी, मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, घाटगे व अन्य

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांना लक्ष्य करून भाजपाला धक्का देण्याचा विडा बारामतीकरांनी घेतला असून त्यासाठी साखर सम्राट मोहरे म्हणून पुढे आणले आहे. अकलूज, सोलापूर, इंदापूर, कागल या भागातील तत्कालीन भाजप नेते पवारांच्या गळाला लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि शहर उत्तर हे दोन भाजपाचे बालेकिल्ले बारामतीच्या निशाण्यावर आहेत.
जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यात आणि त्याआधी देखील भाजप विरोधातच मोर्चा उघडला आहे. शरद पवारांची फूस असल्याची चर्चा नेहमीच होते. आता साखर सम्राट यांनाही तुतारीसाठी सुपारी दिली ही चर्चा निर्णायक ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत अकलूज मध्ये मोहिते पाटलांच्या हातात तुतारी दिली तेव्हाच लक्ष्य फडणवीस अर्थात भाजपा हे अधोरेखित झाले. सोलापूर जिल्ह्यात शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. दक्षिण सोलापूरही जागा काँग्रेसची असून तिथे तुतारी वाजवण्यासाठी धर्मराज काडादी यांना उभे करण्याचे घाटत आहे. विशेष म्हणजे यासाठी काँग्रेसची काही नेते मंडळी देखील अनुकूल आहेत. काडादी यांच्या माध्यमातूनच शहर उत्तरमध्ये भाजपाच्या एका गटाला हाताशी धरून ही जागा देखील तुतारीसाठी अनुकूल करून घेतली जात आहे.
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील ५ वर्षापूर्वी भाजपात आले. परंतु विधानसभेत मतदारांनी नाकारले. तरी देखील पाटलांना पाच वर्ष शांत झोप लागली. या पाच वर्षात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना काय दिले नाही, याचा हिशोब पाहिला तर आमदारापेक्षा खूप काही त्यांनी मिळवले. त्यांना 'गब्बर साखर सम्राट' म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही. ही जागा भाजपाला मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी तुतारी घेतली. कागलचे समरजीत सिंह घाटगे यांच्यावर चंद्रकांत दादा पाटलांची विशेष मर्जी होती. समरजीतसिंह भाजपा जिल्हाध्यक्ष झाले. साखर सम्राट म्हणून सवलतीही लाटल्या. कागलची जागा देखील भाजपाची नाही, म्हणून तेही
तुतारीवाले झाले. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर या साखर पट्ट्यातील शुगर लॉबी तुतारीलीन होत आहे. राज्यात शरद पवारांना टक्कर देणारे एकमेव नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यामुळे जातीचे कार्ड पुढे करून भाजपाची कोंडी करण्याचा त्यांचा इरादा आहे. तसेच जरांगे पाटलांचे आंदोलन आणि त्यांची वक्तव्ये ही त्यासाठी पूरक आहेत.
अकलूजमध्ये भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी देऊन खासदार केले. आता बंधू रणजीतसिंह तुतारीच्या मार्गावर आहेत. असाच एक पॅटर्न धर्मराज काडादी. दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसची. काडादी यांनी लोकसभेत काँग्रेसचा प्रचार केला. त्यामुळे त्यांचा उत्साह जसा वाढला, तसा उमेदवारीसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे दावा केला. परंतु काँग्रेसमध्ये दिलीप माने यांचे प्राबल्य. हे लक्षात आल्यामुळेच धूर्त पवारांनी काडादी यांना खुणवले. यासाठी सुशीलकुमार शिंदे यांचीही साथ असावी. कारण दिलीप माने, शिंदे यांच्या "फेवरीट" पैकी नाहीत. त्यापेक्षा काडादी अधिक जवळचे. कारण ज्येष्ठ नेते स्व. ब्रह्मदेवदादा माने उत्तर सोलापूर (राखीव) मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे विरोधात नेहमी अपक्ष उमेदवार देत. हे शल्य आहेच. शिवाय गेल्या निवडणुकीत माने यांनी शहर मध्य मध्ये प्रणिती शिंदे विरोधात लढत दिली. शिंदे - माने परिवार आणि शिंदे - काडादी परिवार तुलना केली तर काडादी शिंदे यांना जवळचे. तीच बाब शरद पवारांची. (१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात दिलीप माने सर्वप्रथम शरद पवारांच्या जवळ होते, नंतर माने बारामतीशी फटकून राहिले) दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायची आणि भाजपा व दिलीप माने यांची कोंडी करायचे. त्यासाठी काडादींच्या माध्यमातून डाव आखला आहे.
सोलापुरातील आणखीन एक मोठे प्रस्थ म्हणजे थोबडे वकील. तेही पवारनिष्ठ. थोबडे भाजपकडे तिकीट मागतात, इथेच खरी गोम आहे. काडादी यांनी दोन देशमुख अर्थात भाजप विरोधात मोहीम उघडली, त्यासाठी तुतारी पसंती आहे. आ. विजयकुमार देशमुख यांना भाजपाचे तिकीट मिळवून दाखवा, हे जाहीर आव्हान काय सांगते?
पुढचा टप्पा म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून मिलिंद थोबडे यांचे नाव भाजपाच्या एका गटाकडून आणले जात आहे. पाच वर्षापूर्वी देखील असाच प्रकार या गटाने केला होता, थोबडेंनी मेळावाही घेतला. पण ५ वर्षे थोबडे भाजपाच्या कोणत्याच व्यासपीठावर दिसले नाहीत. कालच्या लोकसभा निवडणुकीत देखील थोबडे यांनी भाजपाचा प्रचार केला असे कुठे दिसले नाही. की ऐकायला आले नाही. म्हणून त्यांनी भाजपाकडे तिकीट मागावे याचे निठावंत व प्रामाणिक भाजपा कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटते. आठ दिवसांपूर्वी बावनकुळे यांना भेटलेले थोबडे यांनी आता भाषा बदलली. अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.
शहर उत्तर व दक्षिण सोलापूर येथे भाजपाचे उमेदवार अडचणीत आणणेचा डाव आहे. शहर उत्तरमध्ये काँग्रेसचे अनेक इच्छुक आहेत. महेश कोठे एकमेव दावेदार आहेत, ही तुतारी वाजवावी यासाठीच साखर सम्राट सरसावलेत.
थोबडे यांना मोहरा केला आहे. दुर्दैवाने त्यांना खतपाणी भाजपातील एक गट करीत आहे. असे असेल तर मग तुतारी वाजणार नाही कशावरून? त्यामुळे भाजपासाठी ही धोक्याची घंटा. फडणवीसांना लक्ष्य करून शरद पवार महायुती सरकारविरोधात चंग बांधला हे स्पष्टच आहे.
What's Your Reaction?






