"शहर मध्य"चा कोथरूड पॅटर्न!
कार्यकर्ता फर्स्ट! उपरा लादला, शिवसेनेला सोडला तर पुन्हा घात

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : सोलापुरातील बहुजातीय शहर मध्य मतदारसंघ भाजपा लढवणार का? हा कळीचा मुद्दा आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील हॅट्ट्रिक आमदार, काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना फक्त 894 मताधिक्य मिळाले. यावरून या मतदारसंघाचा कल स्पष्ट होतो. भाजपासाठी हा मतदारसंघ अनुकूल आहे, हे लोकसभा निवडणुकीतील कौल सांगतो. मात्र ही परिस्थिती भाजपा नेत्यांमुळे नव्हे, तर कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन. पण काही नेते आणि त्यांचे स्थानिक समर्थक या ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून मोहीम राबवत आहेत असे दिसते. बुधवारी 'शहर मध्य' साठी भाजपाने कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी मतदान घेतले. तेव्हा या ठिकाणी "नेता नव्हे तर कार्यकर्ता फर्स्ट" असा निष्कर्ष निघाला.
तरीही काही स्थानिक समर्थक बीड जिल्ह्यातील रामभाऊ सातपुते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्रकांत दादा पाटील यांचेसाठी झटले, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्त्यांनी बंद लिफाफ्यातून जी नावे दिली यामध्ये प्रामुख्याने पांडुरंग दिड्डी, रामचंद्र जन्नू, शिवानंद पाटील, देवेंद्र कोठे, नरेंद्र काळे, अंबादास गोरंटला, विजया वड्डेपल्ली श्रीकांचना यन्नम, श्रीनिवास संगा, राजेश मुगळे यांची नावे आहेत. परंतु लोकसभेतील उमेदवार रामभाऊ सातपुते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नावे खोडसाळपणे आली आहेत. अर्थात शहर मध्य मतदार संघ म्हणजे भाजपाला *कोथरूड पॅटर्न* राबवायचा असावा. बाहेरचा उमेदवार लादण्याची ही अंगलट आलेली खोड अजून गेलेली नाही. लोकसभा निवडणुकीत 'उपरा' नको ही मागणी कार्यकर्त्यांनी आग्रहपूर्वक केली. तरीही राम सातपुते यांना उमेदवारी दिली. सातपुते बीड जिल्ह्यातील. 2019 मध्ये माळशिरसमधून आमदार झाले. तिथे स्थानिक मोहिते पाटलांशी जुळूवून घेतले नाही. त्यामुळे अकलूजकरांनी इथे "हात" दाखवला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तेव्हा केलेले वक्तव्य, दादांनी सांगितले म्हणून एका रात्रीत, त्यांना आमदार केला. हे कळीचे ठरले. आता सातपुते माळशिरसमधून लढणार की लढवणार हे अद्याप अनिश्चित आहे. ही स्थिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचीही. दादा कोल्हापूरचे. पुणे विभागातून पदवीधरचे दोन वेळा आमदार झाले. कोल्हापूरचे पालकमंत्री होते. अनेकांना भाजपात आणून मोठी पदे दिली. यापैकी आता बहुतेक जणांची घर वापसी झाली आहे. उदाहरणार्थ समरजीत सिंह घाटगे (कागल). 2019 मध्ये दादांना कोल्हापूर जिल्ह्यात सुरक्षित मतदारसंघ नाही, असे हसन मुश्रीफ नेहमीच म्हणायचे. झाले तसेच. त्यामुळे दादा पुण्यातील कोथरूडमध्ये उभे राहिले. तिथे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना फुल स्टॉप मिळाला. दादा जिंकले. पण मताधिक्य? पुढे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. अजीत पवार सरकारमध्ये आल्यानंतर अजितदादा पालकमंत्री झाले. त्यामुळे भाजपाच्या दादांचे पुनर्वसन सोलापूर जिल्ह्यात झाले.
आता अशाच पद्धतीने त्यांना शहर मध्य मधून लढवण्याचे घाटत आहे. त्यांचे स्थानिक समर्थक केव्हापासूनच सक्रिय आहेत.
'कोथरूड पॅटर्न'मुळे स्थानिक आणि ब्राह्मण वर्ग दुखावला. हा प्रयोग इथे केला तर बहुसंख्येने असलेला तेलुगू भाषिक विणकर मतदार भाजपापासून दुरावण्याची भीती आहे. रविवारी पद्मशाली समाज अधिवेशनात खा. प्रणिती शिंदे यांनी या समाजावर टीका टीपणी करून काँग्रेसला (मला) मतदान केले नाही हे अधोरेखित केले. ही बाब भाजपाने लक्षात घ्यावी आणि हा मतदारसंघ भाजपासाठीच आहे हे गृहीत धरून तेलगू भाषिक विणकर यांना संधी दिली पाहिजे. अशी स्थिती असताना मात्र न पेक्षा शिवसेनेला ही जागा देवू अशी मानसिकता केली तरी देखील तेलगू भाषिक विणकर भाजपापासून दुरावला जाईल.
दोन महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून चाचपणी झाली. तेव्हा तेलुगू भाषिक विणकर समाजाचा विचार केला जावा, जो नेहमी भाजपानुकूल असतो. हे "आम्ही" आवर्जून नमूद केले आहे.
काँग्रेसच्या अस्ताची (१९९५-९६) सुरुवात या तेलुगू भाषिक विणकर समाजानेच केली हे लक्षात घेतले तरी पुरे! (पूर्वार्ध)
What's Your Reaction?






