राज्यात एक लाख हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड करण्याचे नियोजन : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम
राज्यात एक लाख हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड करण्याचे नियोजन : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम
पंढरपूर : वातावरणातील प्रदूषण, वाढते तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्र बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात एक लाख हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन असल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कला मंच ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित “कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी” या पर्यावरण जागृती उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार तानाजी सावंत, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे राज्यात हंगामाबाहेरील पावसाचे प्रमाण वाढले आहे. नोव्हेंबर आणि मे महिन्यातही पाऊस पडतोय, तर पावसाळ्यात ढगफुटी, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये ‘अर्बन फॉरेस्ट’ (Urban Forest) उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून, ठाणे महापालिकेने याअंतर्गत केलेली मोठ्या प्रमाणातील वृक्षलागवड हे राज्यातील सर्व स्थानिक प्रशासनांसाठी आदर्श आहे.
बांबू लागवड – पर्यावरण पूरक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक
“बांबू हा पर्यावरण पूरक, बहुपयोगी आणि जलद वाढणारा वृक्ष आहे. त्यामुळे राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र किमान एक लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.प्रदूषण नियंत्रण मंडळाने या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि प्रदूषण नियंत्रण या सर्व क्षेत्रांमध्ये योगदान द्यावे, असेही त्यांनी सुचवले.
शेतकऱ्यांसाठी शासन खंबीरपणे उभे
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकरी संकटात असतानाही शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष समिती गठीत केली असून, आवश्यक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण जागृतीसाठी सतत उपक्रम आवश्यक
“पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फक्त आषाढी आणि कार्तिकी वारीपुरतेच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर पर्यावरण जागृतीचे कार्यक्रम आयोजित व्हावेत,” अशी सूचना त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाला केली.
“लहान मुलांमध्ये शालेय जीवनापासून वृक्षसंवर्धनाचे संस्कार रुजवणे हेही अत्यावश्यक आहे,” असेही ते म्हणाले.
गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी मोहीम
राज्यातील गड-किल्ले ही आपली अमूल्य वारसा संपत्ती असल्याचे सांगत, शिंदे यांनी रायगड किल्ल्यापासून गड-किल्ले स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्याचे निर्देश दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञान — विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) — याचा कुशल वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
नैसर्गिक शेतीकडे वाटचाल
“पर्यावरण पूरक विकासासाठी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीचा प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आवश्यक आहे,” असे आवाहन शिंदे यांनी केले. त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, “राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने पर्यावरण पूरक कार्याचा वारकरी व्हावे.”
लोककलेच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्कृती कला मंचच्या वतीने किर्तन, भारुड, गोंधळ आणि पोवाडा या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. किर्तनकार प्रकाश खांडगे, मानसी बडवे, शैलजा खांडगे, योगेश चिकटगावकर आणि शाहीर प्रवीण जाधव यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी “कार्तिकीची वारी – पंढरीच्या दारी” या उपक्रमाचा समारोप करताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित वारकऱ्यांसह पावली केली.
प्रदूषण मंडळाचा पर्यावरणपूरक संकल्प
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले की, “राज्यातील बांबू लागवड उपक्रम व्यापक पातळीवर राबवण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवून सातत्याने जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील.” कार्यक्रमाचे प्रस्ताविक एम. डी. सिंह, सदस्य सचिव यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय भुस्कुटे यांनी मानले.
What's Your Reaction?