पालकमंत्री फिफ्टी फिफ्टी आणि एक फ्री!
महाराष्ट्रात असाही पॅटर्न, सातारा जिल्हा लाडका

(विजयकुमार पिसे)
5 डिसेंबर रोजी सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने तब्बल दीड महिन्यानंतर जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले. पण मुंबई उपनगर, कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्ह्याला फिफ्टी फिफ्टी पालकमंत्री मिळाले आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेे, अजीत पवार आणि बावनकुळे यांना एकावर एक फ्री जिल्हा पालकमंत्रीपदाची खुर्ची पदरात पडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दावोस दौर्यावर आहेत, त्यापूर्वी त्यांनी शनिवारी जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले. आणि नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. पालकमंत्री पद हे घटनाबाह्य आहे, पालकमंत्री म्हणजे मलाई आहे, त्यामुळे याची आवश्यकता नाही, अशी चर्चा गेल्या महिनाभरात माध्यमांमध्ये होती, तसेच मंत्र्यांमध्ये जोरदार रस्सीखेच, त्याचे आणखी हे एक कारण. ज्या काही मंत्र्यांनी वक्तव्ये केली, त्यांच्या पदरी निराशा आली. मुंबई उपनगर, कोल्हापूर आणि गडचिरोली या तीन जिल्हयांना पालकमंत्रीशिवाय एकेक सहमंत्री दिला आहे. मुंबई उपनगरसाठी भाजपाचे आशीश शेलार, आणि मंगलप्रभात लोढा, कोल्हापूरसाठी प्रकाश आबीटकर आणि माधुरी मिसाळ आणि गडचिरोलीसाठी स्वत: मुख्यमंत्री फडणवीस आणि आशीश जयस्वाल हे फिफ्टी फिफ्टी पालकमंत्री आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई आणि ठाणे, अजीत पवार पुणे आणि बीड तर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावतीे एकावर एक फ्री (म्हणजे एकापेक्षा अधिक) जिल्हा मिळाला आहे. वास्तविक ठाणे, पुणे व नागपूर हे मोठे जिल्हे आहेत, त्याची विभागणी किंवा तिथे सहमंत्री अपेक्षित आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना मिळालेेले जिल्हे, सहपालकमंत्री यावरून तिथे दोन दोन सत्ताकेंद्रे चालणार आणि प्रशासन व जनतेने नेमके कुणाकडे जावे, कुणाचे ऐकावे असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*सातारा जिल्हा पुन्हा लाडका...
छोटा जिल्हा सातारा पुन्हा एकदा नशीबवान ठरला आहे. फडणवीसांंच्या काळात या जिल्ह्याचे चार आमदार मंत्री झाले आहेत. त्यामुळे सातारा लाडका जिल्हा ठरला. या जिल्ह्यातील चारही मंत्र्यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. शंभुराज देसाई (सातारा) शिवेंद्रसिंह राजेभोसले (लातूर), मकरंद पाटील (बुलढाणा) आाणि जयकुमार गोरे (सोलापूर) हे ते चार पालकमंत्री आहेत.
*या मंत्र्यांना वाटाण्याच्या अक्षता..
पालकमंत्रीपदाच्या शर्यतीमधील दत्तात्रय भरणे, भरत गोगावले, धनंजय मुंडे, दादा भुसे या प्रमुख मंत्र्यांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत. तसेच पंकजा मुंडे (जालना), आदिती तटकरे (रायगड), मेघना बोर्डीकर (परभणी) आणि माधुरी मिसाळ (कोल्हापूर) या चार महिला मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची धुरा मिळाली आहे.
What's Your Reaction?






